yuva MAharashtra देवेंद्र फडणवीस यांचे मनोधैर्य वाढविणारा उच्च न्यायालयाचा निकाल, भाजपलाही मिळाले बळ

देवेंद्र फडणवीस यांचे मनोधैर्य वाढविणारा उच्च न्यायालयाचा निकाल, भाजपलाही मिळाले बळ

| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - शनिवार दि. ५ जुलै २०२५

महाराष्ट्राचे तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले आणि सध्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या आमदारकीसंदर्भात मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेल्या फडणवीस यांच्याविरोधात कॉंग्रेसचे उमेदवार प्रफुल गुडधे पाटील यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे.

२०१४ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले फडणवीस यांनी त्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. २०१९ मध्ये अजित पवार यांच्या पाठिंब्याने पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, परंतु बहुमत सिद्ध न झाल्याने काहीच दिवसांत त्यांनी राजीनामा दिला. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्विकारले. त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये 'महायुती'च्या विजयानंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार प्रफुल गुडधे पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर गुडधे पाटील यांनी फडणवीस यांच्या विजयाला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये फडणवीस यांच्यासह इतर काही उमेदवारांची निवड रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.

मात्र, फडणवीस यांच्यावतीने ज्येष्ठ वकील सुनील मनोहर यांनी कोर्टात युक्तिवाद करताना, याचिका दाखल करताना उमेदवार स्वतः उपस्थित नसणे हा गंभीर procedural दोष असल्याचे सांगितले. यावर न्यायालयानेही सहमती दर्शवून ही याचिका फेटाळली. त्यामुळे आता फडणवीस यांची आमदारकी आणि मुख्यमंत्रीपद सुरक्षित राहिले आहे.

या निर्णयामुळे राज्यातील सत्तासमीकरणावर कोणताही परिणाम होणार नसला, तरी फडणवीस यांच्यासाठी हा निर्णय मोठा मानसिक आणि राजकीय दिलासा देणारा ठरला आहे.