yuva MAharashtra जिल्हा नियोजन समिती सदस्यांची निवड अंतिम टप्प्यात; विविध पक्षांतील उमेदवारांच्या नावांवर चर्चा रंगली

जिल्हा नियोजन समिती सदस्यांची निवड अंतिम टप्प्यात; विविध पक्षांतील उमेदवारांच्या नावांवर चर्चा रंगली


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. १३ जून २०२५ 

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. सांगलीसह राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये या समित्यांवर कोणाला स्थान मिळते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समितीसाठी सदस्यांची यादी तयार करून ती मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवली असून, पुढील दोन दिवसांत त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

महायुतीत भाजप, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्ष, रयत क्रांती संघटना आणि रामदास आठवले यांची आरपीआय यांचा समावेश आहे. या घटक पक्षांमध्ये प्रतिनिधित्वाचे समतोल राखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. विशेषतः सांगली जिल्ह्यातील समितीच्या सदस्य निवडीबाबत मागील काही वर्षांपासून चर्चा सुरूच आहे. यंदा पालकमंत्र्यांनी या विषयावर काय तोडगा काढला आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.


भाजपकडून समितीत कोणाला संधी दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, संग्रामसिंह देशमुख आणि दीपक शिंदे-म्हैसाळकर यांची नावे चर्चेत आहेत. शिंदे गटाकडून कोणाची निवड होणार याकडे देखील राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळ यांची नावे चर्चेत आहेत. जनसुराज्य पक्षातून समीत कदम यांचे नाव निश्चित मानले जात आहे. रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी कोणाचे नाव सुचवले आहे, याबाबतही उत्सुकता आहे. दरम्यान, आरपीआयला प्रतिनिधित्व मिळणार का, याकडे जगन्नाथ ठोकळे व इतर पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.