| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. १३ जून २०२५
गेल्या तीन वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळानंतर राज्य शासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पुढे रेटण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून निवडणूकपूर्व तयारी आणि गट-गण रचनेसाठी हालचाली गतीने सुरू झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपालिकांच्या वाढलेल्या संख्येनुसार, येत्या काळात जिल्हा परिषद गटांची संख्या ६० तर पंचायत समित्यांचे गण १२० एवढे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या आढावा बैठकीत, निवडणुकीच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. २०११ सालच्या जनगणनेच्या आधारे ग्राम्य भागातील लोकसंख्येचा विचार करून गट व गणांची नवीन रचना करण्यात येणार आहे. यामध्ये शहरी भाग म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायतींच्या लोकसंख्येचा समावेश होणार नाही.
येत्या निवडणुकीत प्रत्येक जिल्हा परिषद गटासाठी किमान ५० आणि कमाल ७५ सदस्यांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याच सूत्राच्या आधारे प्रत्येक पंचायत समिती क्षेत्रात जिल्हा परिषदेसाठी एक निवडणूक विभाग असावा, तर त्याच्या प्रत्येकी दोन गणांत विभागणी व्हावी, अशी स्पष्ट सूचना प्रशासनास देण्यात आली आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात निवडणूक गट व गण ठरवताना, सरासरी लोकसंख्येपेक्षा १० टक्के अधिक किंवा कमी फरक ठेवण्याची मुभा आहे. गट रचना करताना उत्तरेकडून सुरू करून, क्रमशः ईशान्य, पूर्व, पश्चिम आणि शेवटी दक्षिणेकडे जात प्रभागांची रचना करावी. त्याच पद्धतीने गट-गण क्रमांकही दिले जाणार आहेत.
प्रशासनाने या प्रक्रियेसाठी भूगोलाशी सुसंगत सलग भागांची रचना ठेवण्याचे बंधन घातले आहे. त्यासाठी गुगल मॅपच्या आधारे नकाशे तयार करण्यात येत असून, प्रत्येक ग्रामपंचायतीची माहिती — नाव, लोकसंख्या, अनुसूचित जाती-जमातींची लोकसंख्या — याचा तपशीलही नोंदवण्यात येत आहे. जिल्हा परिषद गट आणि गण हद्दी काळ्या रंगाच्या ठिपक्यांनी दर्शवाव्यात, अशी सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने गट-गण रचनेचा मसुदा तयार केला असला तरी, राज्य शासनाच्या अधिकृत आदेशाची प्रतीक्षा असल्यामुळे पुढील कारवाई तात्पुरती स्थगित ठेवण्यात आली आहे.