| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शनिवार दि. १४ जून २०२५
राज्यातील प्रवाशांना दर्जेदार सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूर दौर्यादरम्यान अचानक एका अधिकृत हॉटेल थांब्याला भेट दिली. या भेटीत आढळलेल्या असुविधांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर एसटी प्रशासन खडबडून जागे झाले आणि संपूर्ण राज्यातील हॉटेल व मोटेल थांब्यांसाठी नवी आचारसंहिता तातडीने जाहीर करण्यात आली आहे.
या नव्या धोरणानुसार, यापुढे कोणत्याही हॉटेल थांब्याला मंजुरी देताना पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. मान्यता तीन वर्षांच्या कालावधीसाठी दिली जाईल. मात्र, पहिल्या वर्षानंतर थांब्यावरील सेवा-सुविधांचा आढावा घेऊन उर्वरित दोन वर्षांची मुदत वाढ विचाराधीन राहणार आहे.
थांब्यांची निवड करताना स्वच्छता, अन्नपदार्थांचा दर्जा आणि वाहनतळाची सुविधा यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच संबंधित ठिकाणाची पाहणी करून प्रत्यक्ष अहवाल सादर करण्याची जबाबदारी स्थानिक आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी व विभाग नियंत्रकांवर सोपवण्यात आली आहे. याच अहवालाच्या आधारे अंतिम मान्यता दिली जाणार आहे.
हॉटेल थांब्यावर प्रवाशांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच महामंडळाची फसवणूक करणाऱ्या हॉटेल व्यवस्थापनावर एफआयआर दाखल करण्याची तरतूदही या नव्या नियमानुसार करण्यात आली आहे.
महामंडळाच्या मार्ग तपासणी पथकाकडून वेळोवेळी तपासणी केली जाईल. प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि महामंडळाचा महसूल वाढवणे – या दुहेरी हेतूने हे धोरण तयार करण्यात आले आहे.