yuva MAharashtra सांगलीतील उपसा सिंचन प्रकल्पांना गती; पूरप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढणार - जलसंपदा मंत्र्यांचा पुढाकार

सांगलीतील उपसा सिंचन प्रकल्पांना गती; पूरप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढणार - जलसंपदा मंत्र्यांचा पुढाकार


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. १२ जून २०२५ 

सांगली जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाणार असून, उर्वरित क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठीही पाटबंधारे विभागाने ठोस नियोजन करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या. तसेच, संभाव्य पूरस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

वारणाली विश्रामगृह येथे आयोजित पाटबंधारे प्रकल्प व पूर व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, सुहास बाबर, माजी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

प्रकल्प पूर्णत्वासाठी निधी व आराखडे महत्त्वाचे

डॉ. विखे-पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील प्रकल्प विहित कालमर्यादेत पूर्ण व्हावेत यासाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव अभ्यासपूर्ण पद्धतीने सादर करावेत, असे सांगितले. पाण्याचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करण्यासाठी बंदिस्त जलवाहिन्या, विस्तारीकरण, तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सिंचन प्रकल्पांचे फायदे ठळकपणे मांडावेत

सिंचनामुळे वाढणारे कृषि उत्पादन, रोजगार निर्मिती, स्थलांतरावर नियंत्रण, कृषि निर्यातीत वाढ अशा बाबींचा सखोल अभ्यास करून त्याचा इम्पॅक्ट अनॅलिसिस करावा आणि तो कृषि विभागाच्या समन्वयाने सादर करावा, अशी सूचना त्यांनी केली.

पूर व्यवस्थापनासाठी तांत्रिक यंत्रणांचा वापर

राज्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी नदीपात्रातील वहनक्षमता वाढवणे, विसर्ग नियंत्रण, आपत्ती प्रतिसाद क्षमतेस बळकटी देणे अशा उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे या सर्व बाबींचा समावेश असलेला व्यापक आराखडा तयार करावा, असे निर्देश विखे-पाटील यांनी दिले. पूर नियंत्रणासाठी ड्रोनद्वारे पाणीपातळीवर सतत नजर ठेवण्याचीही सूचना त्यांनी केली. आलमट्टी व हिप्परगी धरणांवर पावसाळ्यात पाटबंधारे अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.


पर्यटन विकासालाही चालना

चांदोली व राजेवाडी तलाव यांसारख्या प्रकल्पांना पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी वास्तुविशारदांच्या साहाय्याने जिल्ह्याचा समग्र आराखडा तयार करावा, अशीही सूचना मंत्री विखे-पाटील यांनी केली.

जनप्रतिनिधींच्या मागण्या व सूचना

बैठकीत आमदार सुरेश खाडे यांनी मिरज तालुक्याशी संबंधित प्रश्न मांडले. आमदार बाबर यांनी टेंभू योजनेच्या विस्तारीकरणासाठी निधीची गरज मांडली, तर पडळकर व देशमुख यांनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आदर्श स्वरूपात व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. संचालिका नीता केळकर यांनी सांगली शहरासाठी वारणा धरणातून थेट जलपुरवठा व्हावा अशी मागणी केली.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उपसा सिंचन प्रकल्पांसाठी भूसंपादनाची माहिती दिली. अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे यांनी उपसा सिंचन व पूर नियंत्रणाच्या कामांची सविस्तर माहिती दिली.