| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. १२ जून २०२५
सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्राला स्वच्छ, पुरेसे आणि शाश्वत पाणीपुरवठा मिळावा यासाठी चांदोली धरणाचा थेट वापर करता येईल का, याचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहेत. सांगली दौऱ्यावर असताना त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या विषयावर तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला.
बैठकीत भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी हा विषय मांडत, "जसे कोल्हापूरसाठी काळम्मावाडी धरणातून पाणी आणले जाते, तसाच विचार सांगलीसाठी चांदोली धरणाबाबत करावा," अशी अपेक्षा व्यक्त केली. कृष्णा व वारणा या दोन्ही नद्या प्रदूषणाने ग्रासल्यामुळे सध्याच्या योजना अकार्यक्षम ठरत आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणले. त्यावर मंत्री विखे-पाटील यांनी सहमती दर्शवत तत्काळ अभ्यासाची प्रक्रिया सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. याआधीही महापालिकेच्या महासभेने चांदोली आणि वारणा या दोन पाण्याच्या स्त्रोतांबाबत प्रस्ताव मंजूर केले आहेत. ‘सकाळ’नेही या विषयावर सातत्याने पाठपुरावा करत विशेष सादरीकरणाद्वारे लोकप्रतिनिधींना जागरूक केले होते.
सांडपाणीप्रश्नी मंत्री विखे-पाटील यांचा इशारा
सध्या सांगली महापालिका दररोज नदी प्रदूषणामुळे 10,000 रुपयांचा दंड भरत आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया देत जलसंपदामंत्री म्हणाले, "दंड भरण्याऐवजी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी कर्ज काढा आणि हप्ते भरा. अन्यथा पाणीपुरवठा कपात करण्याची वेळ येईल."
ते पुढे म्हणाले, "सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडणे हा गंभीर प्रकार आहे. सर्व महापालिका व नगरपालिकांनी याबाबत गंभीरतेने पावले उचलली पाहिजेत. इतर कामांसाठी कर्ज घेता, मग या अत्यावश्यक कामासाठी का नाही?"
'चांदोली’ योजनेची ठळक वैशिष्ट्ये
- शुद्ध व मुबलक पाण्याचा टिकावू स्त्रोत
- नैसर्गिक उतारामुळे कमी खर्चात पाणी पुरवठा शक्य
- चांदोली धरणातील शिल्लक जलसाठाही पुरेसा
- शिराळा, इस्लामपूर, आष्टा यांसह अनेक शहरांना लाभ
- पाणी शुद्धीकरणाचा वार्षिक खर्च १० कोटी वाचवता येणार
खासदारांचा आरोप मंत्री म्हणाले, "अभ्यास करतो"
महापूर नियंत्रणासाठीच्या निधीचा गैरवापर करून गटारी बांधणीसाठी वापर होत असल्याच्या खासदार विशाल पाटील यांच्या आरोपावर जलसंपदामंत्री विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. "जर हे खरे असेल, तर याबाबत सविस्तर माहिती घेतली जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले. सांगलीसाठी चांदोली धरण हा एक अत्यंत व्यवहार्य व शाश्वत पाणीपुरवठ्याचा पर्याय ठरू शकतो. प्रशासनाच्या तत्परतेमुळे या दिशेने सकारात्मक पावले उचलली जात आहेत.