| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शनि दि. १४ जून २०२५
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं पुन्हा एकदा बदलण्याचे संकेत दिसत आहेत. एकीकडे ठाकरे आणि इतर विरोधी पक्ष युतीची चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादीचे शरद पवार गट शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे युतीचा हात पुढे करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाशी हातमिळवणीस आमचं दार उघडं आहे, अशी भूमिका शरद पवार गटातील वरिष्ठांनी स्पष्ट केली आहे.
युतीचा निर्णय स्थानिक नेत्यांच्या हाती
महत्वाचं म्हणजे, युतीसंबंधी निर्णय हे आता स्थानिक पातळीवरच घेतले जातील, असंही स्पष्ट केलं जात आहे. त्यामुळे प्रत्येक भागातील राजकीय गणित वेगवेगळं असेल. शिवसेना (UBT) मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेसोबत युतीचा विचार करत आहे, तर काँग्रेस मात्र स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. राष्ट्रवादी (शरद पवार गट) ची ताकद मुंबईत मर्यादित असल्याने, तेही अन्य पक्षांशी हातमिळवणी करू शकतात.
महाविकास आघाडीची असहमती
महाविकास आघाडीतील घटक पक्ष सध्या स्थानिक निवडणुकांत एकत्र लढण्यास फारसे उत्सुक नाहीत. अद्याप या विषयावर आघाडीत कोणतीच ठोस चर्चा झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
शिंदे-अजितदादांच्या युतीचे संकेत
दुसरीकडे, सत्ताधारी महायुतीतील शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनीदेखील निवडणुकांमध्ये समन्वयाने किंवा युती करून लढण्याची तयारी दर्शवली आहे. नुकत्याच राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवारांनी देखील स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार युतीचा निर्णय घेतला जाईल, असा स्पष्ट संकेत दिला.
'हे भातुकलीचं राजकारण नाही'- सुप्रिया सुळे
राष्ट्रवादीतील दोन गट पुन्हा एकत्र येणार का, या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी भावनिक आणि स्पष्ट भाष्य केलं. “माझं आणि अजितदादांचं नातं जन्मापासूनचं आहे. हे फक्त राजकीय समीकरण नाही, तर कुटुंबाचं प्रेम आहे. राजकारण हा भातुकलीचा खेळ नाही. जो काही निर्णय होईल, तो लोकशाही मार्गाने सर्वांना विचारूनच घेतला जाईल,” असं त्या म्हणाल्या.
गुप्त भेटी आणि शह-काटशहाचं राजकारण
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे नव्या युतीच्या शक्यता अधिकच बलवती झाल्या आहेत. त्याचवेळी विरोधी गटातील नेते रोहित पवार यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. "राज ठाकरे कुणाच्या बाजूने वळतील याचा नेम नाही," असे त्यांनी सूचित केले.
राजकीय भाकरी कुठल्या बाजूला फिरतेय, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, राज्यातील आगामी स्थानिक निवडणुका केवळ जागा जिंकण्याचा लढा नसून, राजकीय अस्तित्व टिकवण्याचीही कसोटी ठरणार आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘शह-काटशहाच्या’ खेळात अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.