| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनि दि. १४ जून २०२५
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांनी पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडवली आहे. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी माजी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या कार्यकाळातील कारभाराबाबत गंभीर आरोप करत त्यांच्यावर सखोल चौकशीची मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना संजयकाका म्हणाले, "महापालिकेत नागरिकांना कोणतेही काम पैशांशिवाय होत नसल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. गुप्ता यांच्या कार्यकाळात आर्थिक अनियमितता, कामांमध्ये अडथळे, फाईल्स रखडवणे आणि बांधकाम व्यावसायिकांची अडवणूक यांसारख्या गंभीर बाबी घडल्या आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी व्हावी, ही माझी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिकृत मागणी आहे."
व्हॉट्सअॅप कॉल्सची चौकशीची मागणी
गुप्ता यांच्या व्हॉट्सअॅप संवादाची देखील चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संजयकाकांनी केली. "जिल्हा बँक आणि इतर संस्थांमध्ये आर्थिक देवाणघेवाणी संदर्भात लाचखोरीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. लहान अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते, पण मोठ्या माशांना पकडणेही तितकेच गरजेचे आहे." असे त्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी विकास विभागातही संशयास्पद व्यवहार
संजयकाका यांनी गुप्ता यांच्यावर आदिवासी विकास विभागातही भ्रष्टाचाराचे आरोप लावले. "या विभागाने देखील त्यांच्यावर ठपका ठेवला होता, आणि अशा अधिकाऱ्यांवर वचक बसणे हे प्रशासनाच्या शुचिता रक्षणासाठी अत्यावश्यक आहे," असे मत त्यांनी मांडले.
नवीन आयुक्तांची भेट घेणार
संजयकाकांनी सांगितले की, पूरनियंत्रणाच्या योजनांसाठी केंद्र सरकारकडून निधी आणण्यात आला असून, या निधीचा योग्य वापर होण्यासाठी ते नव्याने नियुक्त आयुक्त सत्यम गांधी यांची लवकरच भेट घेणार आहेत.