yuva MAharashtra विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गणेशवाडीत आज वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे स्मारकाचे भूमीपूजन

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गणेशवाडीत आज वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे स्मारकाचे भूमीपूजन




| सांगली समाचार वृत्त |
शिरोळ - दि. २ जून २०२५

कृष्णा काठावरील कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी हा वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचा गाव. त्यांनी उभी हयात जैन समाज ऐक्य, धर्मरक्षण, सुसंस्कार आणि मुनी-आर्यिका सेवेसाठी खर्ची घातली. प्रथमाचार्य शांतीसागर महाराज, गुरुदेव समंतभद्र महाराज व आचार्यश्री बाहुबली महाराज ही त्यांची धार्मिक प्रेरणा व श्रध्दास्थानं. दिवाण बहादूर आण्णासाहेब लठ्ठे आणि दक्षिण भारत जैन सभा ही त्यांची सामाजिक कार्याची प्रेरणास्थानं. जैन मुनी व आर्यिका, दक्षिण भारत जैन सभा, अन्य जैन संस्था, जिनमंदीरं आणि तीर्थक्षेत्रं यांच्या रक्षणार्थ बलिदानासाठी सज्ज राहिलेले वीराचार्य म्हणजे जैन समाजाची अस्मिता आणि अस्तित्व होते.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन दक्षिण भारत जैन सभेने त्यांना मध्यवर्ती कार्यकारी मंडळावर घेतले होते. अखिल भारतीय तीर्थक्षेत्र रक्षा कमिटीने त्यांना सदस्यत्व स्वतःहून बहाल केले. दक्षिण भारत जैन सभा त्यांच्या नसानसात भिनली होती. त्यांच्या व वीर सेवा दलाच्या कार्याने सभा तळागाळात पोहचली.
    
स्व. डॉ. धनंजय गुंडे व वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या नेतृत्वाखाली वीर सेवा दलाच्या कार्याचा झंझावात सुरु असताना त्यांना प्रारंभीच्या काळातील बिनीचे शिलेदार गणेशवाडीचे धनपाल खोत, कुमार कनवाडे (समाधिस्थ मुनी) स्व. बाळासाहेब शिरगावे यांनी खंबीर साथ दिली आहे. आज वीराचार्य अनुयायांना गणेशवाडीत वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचे भव्य स्मारक व्हावे हे जैन समाजाच्या हितासाठी आवश्यक वाटते. 

या कामी प. पू. आचार्यश्री चंद्रप्रभसागर महाराज यांचा सक्रिय पुढाकार व आशीर्वाद लाभल्याने हे पुण्यकार्य तडीस जाणारच असा आत्मविश्वास गणेशवाडीकरांना आहेच. प. पू. आचार्यश्री १०८ विद्यासागरजी यांचा या कामी आशीर्वाद हा दुग्ध शर्करा योगच आहे. पूज्य चंद्रप्रभसागरजी आणि पूज्य विद्यासागरजी महाराज यांची प्रवचनं तीर्थंकर, प्रथमाचार्य शांतीसागर महाराज, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या कार्यमहतीने खचाखच भरलेली असतात. प. पू. जिनसेनजी महास्वामीजी यांच्या प्रवचनात तीर्थंकर, प्रथमाचार्य, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या कार्याबद्दल अमोघ वाणीतून कायम प्रबोधन सुरु असते.

दक्षिण भारत जैन सभेच्या पुरोगामी विचाराला आशीर्वाद लाभलेले पूज्य मुनीद्वयांची व पूज्य जिनसेनजी महास्वामींजी यांची वीराचार्यांचे स्मारक तडीस नेण्याचा संकल्प आणि गणेशवाडीकरांची प्रामाणिक धडपड लक्षात घेता याला सबंध जैन समाजाचा हातभार लागणार हा आमचा विश्वास आहे. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व सक्रिय सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक गावातून वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या बरोबर दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दलाच्या कार्यात योगदान दिलेले, सध्या सभा व वीर सेवा दलाच्या कार्यात सक्रिय असलेले कार्यकर्ते आणि श्रावक- श्राविका, युवा वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहे. 


या वीराचार्य स्मारक भूमीपूजन सोहळ्यात आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहूल आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, कर्नाटक जैन असोसिएशन बंगळुरुचे सदस्य व अरिहंत उद्योग समुहाचे उत्तमजी पाटील, शेतकरी नेता श्री. अनिल मादनाईक सावकर, वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभल्याने वीराचार्य स्मारक तडीस जाणार असा विश्वास जैन समाजाचा आहे. 

हे केवळ वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचे स्मारक नाही तर ते जैन समाजाला ऐक्याचा संदेश देणारे तीर्थक्षेत्र होणार आहे. या स्मारक भूमीपूजन कार्यक्रम आयोजनात गणेशवाडीतील भ. आदिनाथ आणि भ. महावीर जिन मंदीर पदाधिकारी, ट्रस्टी व सदस्य , वीर सेवा दल शाखेचे पदाधिकारी व सदस्य, आणि वीर महिला मंडळ आणि ब्राम्ही युवती मंडळाचे पदाधिकारी व सदस्य व श्रावक - श्राविका यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे. या भव्य कार्यक्रमास उपस्थित राहून गणेशवाडीकरांना सहकार्य करावे ही आमची कळकळीची विनंती आहे.

"जैन तितुका मेळवावा
पंचरंगीची प्रतिष्ठा गगनावरी न्यावा"
"घराघरात वीराचार्य - मनामनात वीराचार्य"

प्रा. एन.डी.बिरनाळे,
महामंत्री (सांगली)
दक्षिण भारत जैन सभा महापरिवार.