| सांगली समाचार वृत्त |
वाळवा - दि. २ जून २०२५
वाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मृती जपण्यासाठी सुंदर स्मारक लवकरच उभारले जाणार असून, यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सचिन पाटील, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मेघराज भाते, प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुजित भांबोरे, सरपंच नंदाताई चौगुले, उपसरपंच सोनाली पाटील, ग्रामपंचायत अधिकारी शुभांगी भारती, तसेच साठे कुटुंबातील सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री शिरसाट यांनी सांगितले की, “वाटेगाव येथे तलावाशेजारी प्रस्तावित असलेल्या जागेतील गटांची लवकर मोजणी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करून स्मारक उभारणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल. कोणत्याही शेतकऱ्याचा शोषण न करता हा प्रकल्प मार्गी लावला जाईल. यासाठी आवश्यक निधीही पुरवण्यात येईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सर्व समाजासाठी संघर्ष केला. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याची आठवण ठेणारे हे स्मारक परिसरासाठी अभिमानास्पद ठरेल.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री शिरसाट यांनी प्रस्तावित जागेची पाहणी केली आणि त्यासंदर्भात जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांकडून माहिती घेतली. त्यांनी साठे कुटुंबीयांचीही भेट घेतली व स्थानिक शिल्पसृष्टीचा आढावा घेतला.
प्रास्ताविक करताना सचिन साठे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. “स्मारकासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यांच्या संघर्षशील जीवनास साजेसं आणि प्रेरणादायी स्मारक व्हावं, अशी अपेक्षा आहे,” असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.