yuva MAharashtra मराठा समाजाची विवाहासाठी नव्या आचारसंहितेची घोषणा; ११ जणांची अंमलबजावणी समिती स्थापन

मराठा समाजाची विवाहासाठी नव्या आचारसंहितेची घोषणा; ११ जणांची अंमलबजावणी समिती स्थापन


| सांगली समाचार वृत्त |
अहिल्यानगर - दि. २ जून २०२५

मराठा समाजाने विवाह सोहळ्यांतील वाढत्या खर्चावर मर्यादा आणण्यासाठी आणि सामाजिक सुधारणेसाठी नवीन आचारसंहिता जाहीर केली आहे. यामध्ये हुंडा घेणे-देणे थांबवणे, डीजे व प्री-वेडिंगला बंदी घालणे, तसेच विवाह समारंभ १०० ते २०० लोकांमध्येच पार पाडावा असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या नव्या नियमांचे पालन करणाऱ्या तिघा पालकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी ११ सदस्यांची सुकाणू समितीही स्थापन करण्यात आली आहे.

नगर येथील हॉटेल सुवर्णम प्राईड येथे बद्रिनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाची बैठक पार पडली. ही बैठक एन. बी. धुमाळ फाउंडेशनच्या पुढाकाराने झाली. यावेळी माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे, अखिल भारतीय मराठा संघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे, जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत बोलताना तनपुरे महाराजांनी सांगितले की, "समाजात बदल घडवायचा असेल तर प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. अपव्यय आणि अनावश्यक चाली-रूढी सोडून विवाह सोहळे साधेपणाने साजरे करावेत." तालुकास्तरावर समित्या स्थापन करून आचारसंहिता प्रभावीपणे राबवावी, अशी सूचना त्यांनी केली.

डॉ. निमसे यांनी ग्रामीण भागातील तरुणांच्या विवाहातील अडचणी आणि हुंडाबळीच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. विवाहसंहितेबाबत कीर्तनकार, प्रबोधनकार यांनी जनजागृती करावी, असे ते म्हणाले.


या वेळी सी. ए. ज्ञानेश्वर काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीबाबत महत्त्वपूर्ण विषय उपस्थित केला. "शिवराय हे प्रेरणास्थान आहेत, त्यांना देवत्व बहाल करण्याऐवजी त्यांच्या पराक्रमाचे स्मरण ठेवावे," असे ते म्हणाले. विवाह सोहळ्यात शिवरायांची आरती करण्याची पद्धत थांबवावी, अशी त्यांची विनंती होती.

घोषित आचारसंहिता – मुख्य मुद्दे:

  • विवाह सोहळा फक्त १०० ते २०० पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पाडावा
  • हुंडा देणे-घेणे टाळावे, देखावा नको
  • डीजे व प्री-वेडिंग शूटवर बंदी, केलेच तर जाहीर प्रदर्शन टाळावे
  • पारंपरिक वाद्य आणि लोककला कलाकारांना प्राधान्य द्यावे
  • नवरा-नवरी हार घालताना वर उचलण्याची प्रथा बंद करावी
  • दारू पिऊन नाचण्यावर बंदी, शिस्तीचे पालन
  • फेटा फक्त वधूपिता आणि वरपिता यांनीच बांधावा
  • भेटवस्तूऐवजी पुस्तके, रोपं वा रोख स्वरूपात आहेर
  • लग्नासाठी कर्ज घेणे टाळावे, खर्च मर्यादित ठेवावा
  • वधूच्या नावावर FD करण्यास प्राधान्य द्यावे (इच्छेनुसार)
  • जेवणात ५ पेक्षा जास्त पदार्थ नसावेत
  • लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी पार पाडावी

संपूर्ण मराठा समाजाने या आचारसंहितेचे पालन केल्यास विवाहसमारंभात गरजेइतका खर्च, सुसंस्कृत वातावरण आणि सामाजिक एकतेचा आदर्श निर्माण होणार आहे.