yuva MAharashtra सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा, १९० हेक्टर पिकांचे नुकसान

सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा, १९० हेक्टर पिकांचे नुकसान


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. ५ जून २०२५

सांगली जिल्ह्यात मे महिन्यात आलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. जिल्ह्यातील ११७ गावांतील अंदाजे १९० हेक्टर क्षेत्रावरील पिके या पावसामुळे बाधित झाली आहेत. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे कृषी विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येणार आहे.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, शिराळा आणि इतर तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागांत सतत पडणारा पाऊस आणि मुसळधार सरी यामुळे मका, फळपिके, तसेच जिरायती व बागायती क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले.

याच काळात कृषी सहाय्यकांनी आपली विविध मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आंदोलन छेडले होते, त्यामुळे काही काळ पंचनाम्यांची प्रक्रिया थांबली होती. मात्र, त्यांची मागणी मान्य झाल्यानंतर त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे आणि नुकसानीच्या ठिकाणी पंचनाम्यांचे काम वेगाने सुरू झाले आहे.


शिराळा तालुक्यात २२ गावांमधील २६४ शेतकऱ्यांच्या ४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद असून, त्या ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले आहेत. लवकरच त्याचा अंतिम अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे.

याशिवाय एप्रिल महिन्यात वाळवा, तासगाव, जत, कवठेमहांकाळ, पलूस व विटा या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपीटीने हाहाकार उडविला होता. त्या आपत्तीमध्ये ५४ गावांतील ३९२ शेतकऱ्यांचे २३७ हेक्टरवरील पीक नुकसानग्रस्त झाले होते. मार्च ते मे दरम्यान झालेल्या पावसामुळे एकूण ९९६ शेतकऱ्यांचे ४२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी सांगितले की, मार्च महिन्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. सध्या मे महिन्याच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून, ते लवकरच पूर्ण करून संबंधित विभागाकडे अहवाल पाठवला जाईल.