yuva MAharashtra अहमदाबाद विमानतळावर तासगावचे ४५ प्रवासी अडकल्याने गोंधळ, आ. रोहित पाटीलांनी घेतली दखल

अहमदाबाद विमानतळावर तासगावचे ४५ प्रवासी अडकल्याने गोंधळ, आ. रोहित पाटीलांनी घेतली दखल


| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - शुक्रवार दि. १३ जून २०२५ 

अहमदाबाद विमानतळावर झालेल्या विमान अपघातामुळे उड्डाण व्यवस्थेचा संपूर्ण ताळतंत्र बिघडला आहे. या अनपेक्षित घटनेमुळे अनेक प्रवासी विमानतळावर अडकून पडले असून, तासगाव तालुक्यातील ४५ प्रवाशांनाही त्याचा फटका बसला आहे.

माउंट अबू (राजस्थान), साबरमती आणि गुजरातमधील विविध पर्यटनस्थळांची सहल करून परतणाऱ्या या प्रवाशांना अहमदाबाद विमानतळावर अडखळावे लागले. उड्डाण सेवेत अडथळा निर्माण झाल्याने त्यांच्या परतीच्या प्रवासात अडचण निर्माण झाली आहे.


या परिस्थितीची माहिती मिळताच तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी तत्काळ याची गंभीर दखल घेतली. त्यांनी संबंधित विमान कंपनी व प्रशासनाशी संपर्क साधून प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत विचारणा केली तसेच त्यांच्या परतीच्या प्रवासाची सोय लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

स्थानिक प्रशासनाकडूनही अडकलेल्या प्रवाशांसाठी आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात येत आहे. परिस्थिती लवकरच पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.