| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. ३ जून २०२५
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सरकारी कामकाजातील ढिसाळपणावर नाराजी व्यक्त करत, टोल वसुली करणारे व निकृष्ट दर्जाचे काम करणारे कंत्राटदार यांच्यावर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्यांना आता थेट तुरुंगात पाठवणार असून, त्यांचे फोटोही घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
गडकरी म्हणाले, “याआधी कंत्राट मिळवण्यासाठी तांत्रिक आणि आर्थिक पात्रता आवश्यक होती. पण आता फक्त काळा कोट घालून कोणीही आलं की त्यालाच कंत्राट दिलं जातं, अशी स्थिती झाली आहे.” त्यांनी भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण यंत्रणा तयार होणे आवश्यक असल्याचे ठासून सांगितले.
नागपूरमध्ये ‘सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट’च्या रौप्य महोत्सवात बोलताना गडकरी यांनी माहिती दिली की, ब्रह्मपुत्रा नदीखाली १२ हजार कोटी रुपये खर्च करून बोगदा बांधण्याचे काम सुरू आहे. हा खर्च कमी करण्यासाठी गेल्या वर्षभरात त्यांनी विविध तांत्रिक व आर्थिक पैलूंचा सखोल अभ्यास केला आहे.
गडकरी यांनी यापूर्वीही देशातील वाढत्या रस्ते अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली होती. सिव्हिल इंजिनिअर्स, सल्लागार व सदोष डीपीआर (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट) यांना त्यांनी या अपघातांसाठी जबाबदार ठरवले होते. त्यांनी असा आग्रहही व्यक्त केला की, निकृष्ट रस्ते बांधणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवले जावे.
दरवर्षी देशात सुमारे ४ लाख ८० हजार रस्ते अपघात घडतात, ज्यामध्ये १ लाख ८० हजार लोकांचा मृत्यू होतो. विशेष म्हणजे, यातील ६६.४% मृत्यू १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे असतात, जे देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या अपघातांमुळे देशाच्या जीडीपीला जवळपास ३ टक्क्यांचे नुकसान होते. गडकरी यांचे मत आहे की, अशा दुर्दैवी घटनांमुळे देशाच्या प्रतिभावान युवकांचा आणि महत्त्वाच्या व्यक्तींचा अपमूल्यन होत असून, ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे.