| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ जून २०२५
सांगलीतील राजकीय वर्तुळात सध्या मोठे हालचाली सुरू आहेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या संस्थेत नुकत्याच पार पडलेल्या रांगोळी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला भाजपसह सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावल्याने राजकीय भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात भाजप आणि शिंदे गटातील दिग्गज नेत्यांनीही सहभाग घेतल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत पाटील यांना झालेल्या अंतर्गत बंडखोरीचा फटका अजूनही जाणवत आहे. त्यांचे अनेक समर्थक सध्या पक्षाच्या कार्यक्रमांपासून अलिप्त राहणेच पसंत करत आहेत. याच दरम्यान, पृथ्वीराज पाटील यांचे सत्ताधारी पक्षांतील नेत्यांशी वाढते संबंध लक्ष वेधून घेत आहेत. त्यांचे निवासस्थान हे अलीकडे भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदेसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठींसाठी केंद्रबिंदू ठरले आहे.
पाटील हे अजूनही काँग्रेसचे शहराध्यक्ष असले तरी पक्षातील त्यांच्या सक्रियतेत लक्षणीय घट झाली आहे. काँग्रेसच्या बैठका, आंदोलनं किंवा नियोजनांपासून ते सध्या दूर आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात काँग्रेसमध्ये दोन स्पष्ट गट दिसून येतात – पृथ्वीराज पाटील यांचा गट आणि जयश्रीताई पाटील यांचा गट. या दोन्ही गटांतील अंतर्गत संघर्षामुळे पक्षाची एकसंघ प्रतिमा धूसर झाली आहे.
दरम्यान, खासदार विशाल पाटील यांचेही भाजप नेत्यांशी संबंध वाढताना दिसत आहेत. त्यांना भाजपकडून पक्षप्रवेशासाठी खुले आमंत्रण मिळत असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे काँग्रेसचे स्थान आगामी महापालिका निवडणुकीत कमजोर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पृथ्वीराज पाटील यांच्या संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या रांगोळी उपक्रमात ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी उद्घाटन केले. त्यांच्यासोबत आमदार सुरेश खाडे, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सत्यजीत देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील आणि भाजपा नेते मकरंद देशपांडे यांची उपस्थिती होती. तसेच, त्याच दिवशी शिंदेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. या सर्व घडामोडींमुळे सांगलीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत काँग्रेसने अनेक वर्षे सत्ता गाजवली, परंतु गेल्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळवले. आता काँग्रेसमधील अंतरकलह आणि संभाव्य गटबाजीमुळे आगामी निवडणुकीत पक्षाला संघटनेची नव्याने बांधणी करावी लागणार आहे. ही प्रक्रिया नेत्यांसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.