| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३ जून २०२५
विद्यार्थ्याला फटकारले म्हणून त्याने आत्महत्या केली, यावरून शिक्षकाला गुन्ह्यात अडकवणं योग्य नाही, असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित शिक्षकाची निर्दोष मुक्तता केली आहे. "शिक्षकाने विद्यार्थ्याला रागावल्याने त्याने आत्महत्या केली, असा निष्कर्ष सामान्य माणूसही सहज लावू शकत नाही. विद्यार्थ्याला फटकारणं म्हणजे त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणं नव्हे," असं खंडपीठाने ठामपणे सांगितलं.
घटना काय घडली होती ?
तामिळनाडूतील एका शाळेतील वसतीगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्याने शिक्षकाकडे एका सहाध्यायाची तक्रार केली होती. त्या पार्श्वभूमीवर शिक्षकाने संबंधित विद्यार्थ्याला शिस्तीच्या उद्देशाने फटकारलं आणि अशी चूक पुन्हा होऊ नये, याबाबत समजावलं. काही दिवसांनी त्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर शिक्षकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मद्रास उच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत शिक्षकाला दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. मात्र, या निर्णयाविरोधात शिक्षकाने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलं.
शिस्त राखण्यासाठी पालकत्वाची भावना
या प्रकरणात शिक्षकाचे वकील म्हणाले की, शिक्षकाने कुठलाही द्वेष न ठेवता फक्त पालकत्वाच्या भावनेतून विद्यार्थी फटकारला. शाळेतील वातावरण शांत आणि शिस्तबद्ध राहावं, हाच त्यामागचा उद्देश होता. शिक्षकाचे मृत विद्यार्थ्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते.
सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकाला दिला दिलासा
न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की, शिक्षकाने आपली जबाबदारी पार पाडताना केलेली कृती हेतुपुरस्सर किंवा मानसिक त्रास देण्यासाठी नव्हती. शिक्षकाने फटकारणं म्हणजे आत्महत्येस उद्युक्त करणं असा निष्कर्ष निघू शकत नाही.
त्यामुळे, शिक्षकावर लावलेला कलम ३०६ अंतर्गतचा गुन्हा फेटाळण्यात आला आणि त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.