| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २ जून २०२५
नाशिकमध्ये परशुराम भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्तपावन ब्राह्मण समाजाच्या ऐतिहासिक योगदानाचा विशेष उल्लेख केला. या कार्यक्रमाचे आयोजन चित्तपावन ब्राह्मण संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.
फडणवीस म्हणाले, "जरी ब्राह्मण समाजाची संख्या फारशी मोठी नसली, तरी त्यांचं कार्य दुधात साखरेसारखं आहे. जसं थोडीशी साखरही गोडवा निर्माण करते, तसंच समाजात ब्राह्मणांनी केलेली भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे."
ते पुढे म्हणाले, "स्वातंत्र्य संग्राम असो की साहित्य-कलेचं क्षेत्र, प्रत्येक पिढीत चित्तपावन समाजाचे लोक आपलं वेगळं स्थान निर्माण करत आले आहेत. तुम्ही कुठलाही क्षेत्र बघा, १० नावं घेतली तर त्यात ३-४ नावं चित्तपावन समाजातील असतीलच."
या सोहळ्यात फडणवीसांनी संघटनेच्या कार्याचं आणि नव्याने उभारण्यात आलेल्या परशुराम भवनाचं कौतुक केलं. "हॉस्टेल उभारणं, गरजूंना मदत करणं ही कामं कौतुकास्पद आहेत. ही संघटना ९३ वर्षांपासून न थांबता कार्यरत आहे, हे फार प्रेरणादायक आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
जात या विषयावर बोलताना ते म्हणाले, "जात नसावी, अशी सगळ्यांची इच्छा असते, पण प्रत्यक्षात ती जात नाही. तरीही सामाजिक विषमता दूर करायची असेल, तर जे पुढे गेले आहेत त्यांनी इतरांना सोबत घ्यावं. समाजात सर्वांगीण प्रगती हवी असेल, तर हे फार आवश्यक आहे."
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थितांना पुढील पिढ्यांवर चांगले संस्कार करण्याचे आणि एकोप्याने समाजाला पुढे नेण्याचे आवाहन केले.