yuva MAharashtra 'जयतु कृष्णे' अभियानास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भरभरून प्रतिसाद; जलसंपदा विभागाला पुढील कार्यवाहीचे आदेश

'जयतु कृष्णे' अभियानास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भरभरून प्रतिसाद; जलसंपदा विभागाला पुढील कार्यवाहीचे आदेश

फोटो सौजन्य :Wikimedia commons 

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. २४ जून २०२५

कृष्णा नदीच्या शुद्धीकरणासाठी सुरू असलेल्या 'जयतु कृष्णे' या सामाजिक उपक्रमाला राज्य शासनाकडून मोठा पाठिंबा मिळाला आहे. या अभियानाचे प्रणेते राकेश दोड्डणावर यांनी अलीकडेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी कृष्णा नदीत वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी विनंती निवेदनाद्वारे केली.

या निवेदनात कृष्णा नदीतील प्लास्टिकचा कचरा, सांडपाणी, औद्योगिक व रासायनिक घाण यामुळे नदीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याचे ठळकपणे नमूद करण्यात आले होते. यावर गांभीर्याने प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना त्वरित कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यांनी या मोहिमेचे मनापासून कौतुक करत “शासन या उपक्रमाला १००% सहकार्य करेल” असा विश्वासही व्यक्त केला.


१ जून रोजी सांगलीत पार पडलेल्या ‘भव्य कृष्णामाई स्वच्छता रॅली’ मध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. “कृष्णा नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून आपली संस्कृती आणि अस्मितेचा भाग आहे” हे या रॅलीतून ठळकपणे अधोरेखित झाले. या उपक्रमामुळे एक व्यापक लोकचळवळ उभी राहिली असून, राकेश दोड्डणावर यांनी या मोहिमेला ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर राज्यस्तरीय मान्यता मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडेही प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी या अभियानातील छायाचित्रे आणि वृत्तकात्रणे पाहून समाधान व्यक्त केले आणि पुढील टप्प्यातील शासकीय पाठबळाची ग्वाही दिली. हा सकारात्मक दृष्टिकोन ही मोहीम अधिक व्यापक करण्यास निश्चितच बळ देणारा आहे.

कृष्णा नदीचे पाणी पिणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आपल्या नदीच्या रक्षणासाठी पुढे यावे, असा जनतेला संदेश देत राकेश दोड्डणावर यांनी या अभियानाची व्याप्ती आणखी वाढवण्याचे आवाहन केले आहे. "कृष्णामाई निर्मळ होण्यासाठी ही केवळ चळवळ नाही, तर आपली जबाबदारी आहे" असे ते ठामपणे सांगतात.