yuva MAharashtra ‘जयतु कृष्णे’ मोहिमेला मान्यता देण्याची मागणी; स्वच्छतादूत राकेश दड्डणावर यांचे मुख्यमंत्री कार्यालयात निवेदन

‘जयतु कृष्णे’ मोहिमेला मान्यता देण्याची मागणी; स्वच्छतादूत राकेश दड्डणावर यांचे मुख्यमंत्री कार्यालयात निवेदन


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - रविवार दि. १५ जून २०२५

कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या 'जयतु कृष्णे' अभियानास राज्य शासनाची अधिकृत मान्यता मिळावी, तसेच मोहिमेसाठी विशेष निधी व धोरणात्मक आराखडा तयार व्हावा, अशी मागणी निर्धार फाऊंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांनी मुख्यमंत्री सचिवालयातील सहसचिव आशा पठाण यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. यासोबतच 'नमामि गंगे' योजनेच्या धर्तीवर केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची शिफारसही त्यांनी केली आहे.

२६०० दिवसांची सेवा – एक समर्पित चळवळ

राकेश दड्डणावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली सात वर्षांहून अधिक काळ कृष्णा नदी आणि नदीकाठच्या परिसराच्या स्वच्छतेसाठी अखंड प्रयत्न सुरू ठेवले आहेत. काही स्वयंसेवकांपासून सुरू झालेल्या या उपक्रमात आज शेकडो नागरिक सहभागी झाले असून, ही एक सामाजिक लोकचळवळ बनली आहे.

कृष्णेची वेदना – 


सातारा आणि सांगली जिल्ह्यांतून वाहणारी कृष्णा नदी महाराष्ट्रातील महत्त्वाची जलवाहिनी आहे. लाखो नागरिकांच्या जीवनाशीस जोडलेली ही नदी आज प्लास्टिक, सांडपाणी आणि औद्योगिक कचऱ्यामुळे गंभीरपणे प्रदूषित झाली आहे. त्यामुळे केवळ जलप्रदूषणच नव्हे तर परिसरातील पर्यावरण आणि आरोग्य व्यवस्थाही धोक्यात आली आहे.

‘कृष्णामाई स्वच्छता रॅली’ने दिला जागर

१ जून रोजी सांगलीत हजारो नागरिकांच्या सहभागाने ‘कृष्णामाई स्वच्छता रॅली’चे आयोजन करण्यात आले. यामध्ये ‘कृष्णा नदीची जबाबदारी आपली’ अशी सामूहिक शपथ घेण्यात आली. ही रॅली स्वच्छतेसह जनजागृतीचा संदेश देणारी ठरली.


नदीप्रेमातून साकारलेला संकल्प

राकेश दड्डणावर यांनी सादर केलेल्या निवेदनात पुढील तीन मुद्द्यांवर शासनाच्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे –

'जयतु कृष्णे' मोहिमेस अधिकृत मान्यता द्यावी.
  • या अभियानासाठी स्वतंत्र निधी आणि स्पष्ट धोरण आखावे.
  • केंद्र शासनाकडे 'नमामि गंगे'सदृश योजना प्रस्तावित करावी.

नदी ही केवळ प्रवाह नव्हे – 

ती आमचं जीवन आहे
“कृष्णा नदी ही आमची संस्कृती आहे, आमचं अस्तित्व आहे. तिचं रक्षण ही केवळ आमचीच नाही, तर शासनाचीही जबाबदारी आहे,” असा भावनिक साद दड्डणावर यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

शासनाने या उपक्रमाला मान्यता दिल्यास ही मोहीम एक आदर्श जलसंवर्धन चळवळ ठरेल आणि इतर नद्यांसाठीही दिशादर्शक ठरू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.