| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जून २०२५
पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला, एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं हे त्यांनी कार्यातून दाखवून दिलं. त्या एक द्रष्ट्या प्रशासक, न्यायप्रिय नेत्या, धर्मपरायण समाजसुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, त्यांचे स्मरण त्यांच्या विचारांमधून नव्याने प्रेरणा देणारे आहे. असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले. ते आज काँग्रेस भवन येथे अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.
त्यांच्या प्रशासन आणि सामाजिक कार्यात धर्म, न्याय, लोकसेवा आणि नीतीमूल्यांचे सखोल अधिष्ठान होते. अहिल्यादेवीनी एक पारदर्शक, न्यायपूर्ण आणि लोकाभिमुख राज्यकारभार चालवला. अहिल्याबाई दररोज प्रजेसोबत संवाद साधत, त्यांच्या अडचणी समजून घेत आणि न्याय देत. हे त्यांचे कार्य आजच्या लोकशाही व्यवस्थेलाही मार्गदर्शक ठरावे असेच आहे, असे यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले.
पृथ्वीराज पाटील पुढे म्हणाले, "अहिल्यादेवींनी प्राचीन आणि पवित्र स्थळांचे जीर्णोद्धार करून त्यांनी भारतीय सांस्कृतिक एकात्मतेचे धागे पुन्हा मजबूत केले. याशिवाय देशभर त्यांनी शेकडो धर्मशाळा, घाट, कुंड, विहिरी, अन्नछत्रे आणि विश्रामगृहे उभारली. हे कार्य कोणत्याही जाती-धर्माचा भेद न करता सर्वसामान्य जनतेसाठी केले गेले. त्यांच्या या पुढाकारामुळे हजारो लोकांना निवारा, अन्न आणि आधार मिळाला.त्यांचे हे सामाजिक कार्य “लोककल्याणकारी राज्यशासनाचा” आदर्श नमुना आहे. भारत सरकारने त्यांच्या स्मृतींना वंदन म्हणून टपाल तिकीट प्रकाशित करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. राज्य शासनाने त्यांच्या सन्मानार्थ महिला उन्नतीसाठी योजना जाहीर केल्या आहेत. अहिल्यादेवींचे भरीव कार्य कार्य आजही महिला उद्योजिकांसाठी मार्गदर्शक ठरते."
सांगलीत काँग्रेस भवन येथे सांगली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ मालनताई मोहिते व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी अजित ढोले यांनी स्वागत प्रस्ताविक केले.
यावेळी अनिल मोहिते, अमित पारेकर, मालनताई मोहिते, पैगंबर शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अरुण पळसुले, नामदेव पठाडे, मीना शिंदे व सीमा कुलकर्णी, सुरेश गायकवाड, मुफित कोळेकर विक्रम कांबळे, विवेक अंकलेकर विक्रम सिंह उर्फ राजू पाटील शिवाजी सावंत, विठ्ठलराव काळे, अमोल पारेकर, महेश माने, गणेश वाघमारे, व काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार सौ प्रतीक्षा काळे यांनी मांडले.