| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २७ मे २०२५
मुंबई आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्रीपासून पावसाने जोरदार आगमन केलं आहे. सोमवारी पहाटेपासूनच मुंबईकरांना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने जागं केलं. कुर्ला, विद्याविहार, सायन, दादर, परळ आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागानुसार, पुढील काही तासांत मुंबईत मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर पडावे, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.
हवामान खात्याने मुंबईसह संपूर्ण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, मुंबई, ठाणे, पालघरसह काही इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत वादळी वाऱ्यांसह ५०-६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
पावसामुळे मुंबईतील दादरच्या हिंदमाता भागात तसेच भायखळा स्थानकात पाणी साचले आहे. परळ येथील केईएम रुग्णालयात पाणी शिरल्यामुळे रुग्णसेवांवर परिणाम झाला आहे. मंत्रालयाजवळ गुडघाभर पाण्यातून मार्ग काढताना कर्मचारी आणि नागरिकांची त्रेधा उडाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
मुंबईच्या उपनगरांतही पावसाचा जोर कायम असून, पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्ष त्वरित कार्यान्वित केला आहे. स्थानिक रेल्वे आणि बस वाहतुकीवरही याचा परिणाम जाणवत असून, प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी आवश्यकतेनुसारच घराबाहेर पडावे, असा पुन्हा एकदा इशारा देण्यात आला आहे.
रेल्वे वाहतूकही पावसामुळे विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या कल्याणमार्गावरील धीम्या गाड्या उशिराने धावत आहेत, तर सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद गाड्या सरासरी १० मिनिटे उशिराने चालत आहेत. हार्बर आणि पश्चिम मार्गावरील गाड्यांनाही उशीर होत आहे. पावसामुळे कार्यालयीन आणि दैनंदिन जीवनावर परिणाम झाला असून, सामान्य नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.