| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. २७ मे २०२५
राज्यात विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने आढावा घेत आहेत. नागरिकांना वेळीच मदत मिळावी यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारीत राहावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. पावसामुळे ज्या भागात हानी झाली आहे, तिथे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस हे राज्याचे मुख्य सचिव आणि आपत्ती निवारण कक्षाशी नियमित संपर्कात असून, सर्व जिल्हा प्रशासनांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले आहे.
राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि 'एमएमआर' भागात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये ११७ मि.मी., बारामतीत १०४.७५ मि.मी., इंदापुरात ६३.२५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बारामतीत २५ घरे अंशतः कोसळली असून, ७ नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप वाचवण्यात आले आहे. ७० ते ८० कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. काल काही काळ मोबाईल सेवा विस्कळीत झाली होती, मात्र आता ती पूर्ववत होत आहे. इंदापुरात दोन नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
फलटण तालुक्यात १६३.५ मि.मी. पाऊस झाल्याने 'एनडीआरएफ'चे पथक तैनात करण्यात आले आहे. दुधेबावी गावाजवळ अडकलेल्या ३० नागरिकांना सुरक्षित निवास आणि अन्नाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात ६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पंढरपूरमध्ये भीमा नदीच्या पात्रात अडकलेल्या ३ नागरिकांचे बचावकार्य सुरू आहे. रायगड जिल्ह्यात वीज पडून एका नागरिकाचा मृत्यू झाला असून, महाड ते रायगड किल्ला जाणारा रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.
मुंबईत वीजपुरवठ्याशी संबंधित १८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. ५ ठिकाणी इमारतींच्या भिंती पडण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, पोलिस यंत्रणा आणि इतर आपत्कालीन सेवा सतर्क आहेत. शहरात 'एनडीआरएफ'ची ५ पथके तैनात असून, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास त्या सज्ज आहेत.
हवामान खात्याने पुढील २४ तासांत मुंबईत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, महसूल व गृह विभाग यांना तात्काळ प्रतिसादासाठी नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. जलसंपदा विभागाशीही सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.