| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. २७ मे २०२५
येथे झालेल्या एका सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) वर तीव्र टीका केली. या मोहिमेमुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. मात्र, उद्धव गटातील एका नेत्याने या शिष्टमंडळाला "वरात" असे म्हणत अवहेलना केली, यावरून शाह यांनी नाराजी व्यक्त केली.
शाह म्हणाले, “हा पक्ष एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंचा होता. जर आज बाळासाहेब असते, तर त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींना मिठी मारली असती. पण आज याच पक्षाचे नेते, सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाची खिल्ली उडवत आहेत. विशेष म्हणजे, त्यांचेच काही खासदार यामध्ये सहभागी आहेत."
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात बोलताना शाह यांनी पुढे सांगितले की, "‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जगाला भारताची शक्ती कळली आहे. २०४७ पर्यंत आपल्याला केवळ विकसित राष्ट्र बनायचे नाही, तर असा भारत घडवायचा आहे, ज्याच्याविरोधात कोणी वाकडी नजर टाकायचीही हिंमत करणार नाही."
तसेच, त्यांनी ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’चा उल्लेख करत नक्षलवाद्यांविरोधातील यशस्वी मोहिमेचे वर्णन केले. “छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या गडांवर सीआरपीएफ, बीएसएफ आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. नंतर पुन्हा ३६ नक्षली मारले गेले. अनेकांनी आत्मसमर्पण केले, काहींना अटकही करण्यात आली,” असे सांगत त्यांनी घोषणा केली की, “३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येईल.”
मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नावर बोलताना शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले. “पुढील पाच वर्षांत फडणवीस यांच्या पुढाकारामुळे मराठवाड्यातील प्रत्येक गावात पाणी पोहोचेल. कोकण व कृष्णा खोऱ्यातील नद्यांचे पाणी मराठवाड्याच्या घराघरात पोहोचेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.