| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ मे २०२५
भारतीय लष्कराने पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त करत 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वीपणे पार पाडल्यानंतर सांगली आणि मिरज शहरात नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. या विजयाचा आनंद व्यक्त करत शहरवासीयांनी साखरपेढे वाटले, फटाके फोडले आणि देशभक्तीपर घोषणा देत जल्लोष केला.
पहलगाममधील अलीकडील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांमध्ये संतापाची भावना होती. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने मध्यरात्री पाकिस्तानच्या सीमेमध्ये प्रवेश करत अतिरेकी तळांवर अचूक कारवाई केली. या धडक कारवाईचे शहरात जोरदार स्वागत झाले.
सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ युवा शिवप्रतिष्ठानच्या वतीने मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष नितीन चौगुले यांनी भारतीय लष्कराचे कौतुक करत, केंद्र सरकारने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत त्यांनी अमेरिका, जपान, इस्रायल आणि रशिया या देशांनी भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमात स्नेहा चौगुले, शीला चौगुले, विद्या साळुंखे, अंजली बोळाज, कोमल जाधव, ऋग्वेदा पेटारे यांच्यासह मोहनदादा शिंदे, संदीपराव जाधव, रामभाऊ जाधव, आनंदराव चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरजमध्ये शिवसेना (शिंदे गट) तर्फे किरणसिंह रजपूत यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौकात फटाक्यांची आतषबाजी करत "पाकिस्तान मुर्दाबाद"च्या घोषणा देण्यात आल्या.