yuva MAharashtra देहू संस्थानचा ऐतिहासिक निर्णय; बैलजोडीचा परंपरागत मान यंदापासून थांबणार !

देहू संस्थानचा ऐतिहासिक निर्णय; बैलजोडीचा परंपरागत मान यंदापासून थांबणार !

फोटो सौजन्य : Wikimedia commons 

| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १९ मे २०२५

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, देहू संस्थानने यावर्षी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दरवर्षी बाहेरून मागवलेल्या बैलजोड्यांना पालखी रथ ओढण्याचा मान दिला जात असे. मात्र यंदापासून ही परंपरा थांबवून, संस्थान स्वतःच्या मालकीच्या नव्या बैलजोड्या खरेदी करणार आहे. या निर्णयामुळे वर्षानुवर्षांची परंपरा खंडित होत आहे.

यंदाचा 340 वा पालखी सोहळा 18 जून रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. याच दिवशी तुकोबारायांची पालखी रथातून निघणार असून, त्यानंतर 19 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे.

देहू संस्थानकडून यावर्षीपासून पालखी रथ ओढण्यासाठी अर्ज मागवले जाणार नाहीत. त्याऐवजी संस्थानच्या स्वतःच्या बैलजोड्या या कार्यासाठी वापरण्यात येणार आहेत. हा निर्णय म्हणजे परंपरेत एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.


याशिवाय, यंदाच्या वारीदरम्यान पर्यावरणपूरक उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत. पालखी मार्ग मोठा झाल्याने वाटेवर सावलीची कमतरता भासत आहे. याची दखल घेत संस्थानने रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. यामुळे पुढील काही वर्षांत या मार्गावर डेरेदार झाडांची सावली निर्माण होऊन लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.