| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ एप्रिल २०२५
विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले माजी खासदार संजयकाका पाटील यांचं पुन्हा भाजपमध्ये जाण्याचे प्रयत्न अलीकडेच गती घेत होते. त्यांनी यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून भेटीगाठीही घेतल्या होत्या. मात्र, भाजप नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजयकाका सध्या राष्ट्रवादीतच असल्याचे स्पष्ट करत, त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर असल्याचं सांगितलं.
रविवारी पार पडलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडीत संजयकाकांच्या समर्थकांना दुर्लक्षित करण्यात आलं. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या शक्यतेला तात्पुरता ब्रेक लागल्याचं बोललं जात आहे. संजयकाका पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर पराभव पत्करल्यानंतर, विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र तिथेही यश न मिळाल्यामुळे त्यांनी पुन्हा भाजपकडे वळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट दिली होती. मात्र आता त्याच पाटील यांनी "संजयकाकांचं पुनर्वसन राष्ट्रवादीतच व्हावं," असं जाहीरपणे सांगितल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
इस्लामपुरातील माजी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हे देखील संजयकाकांसोबत राष्ट्रवादीत दाखल झाले होते आणि त्यांनी तिथेच राजकीय सक्रियता वाढवली होती. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर संजयकाका फारसे राजकीयदृष्ट्या सक्रीय दिसले नाहीत. काही दिवसांपूर्वी मात्र त्यांनी आपल्या पुत्र प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सभासद नोंदणी मोहीम राबवण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं. प्रभाकर पाटील हे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे प्रमुख नेते आहेत. मात्र रविवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीत संजयकाकांच्या गटाला स्थान न मिळाल्याने, त्यांच्या संभाव्य 'घरवापसी'ला झटका बसल्याचं म्हटलं जात आहे.
पालकमंत्री पाटील यांची स्पष्ट भूमिका
संजयकाका सध्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे त्यांचं पुढचं राजकीय स्थान ठरवण्याची जबाबदारी अजित पवार यांचीच असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत स्पष्ट केलं. त्यांनी संजयकाकांना "आपले जुने मित्र" असे संबोधित करत, त्यांच्या पुनर्वसनात मदत करण्याचंही सूतोवाच केलं.
आता पुढे काय ?
राजकीय घडामोडींमध्ये संजयकाकांची भूमिका नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे. निवडणुकीनंतर त्यांनी सक्रियता कमी केली असली तरी भाजपमध्ये पुनर्प्रवेशासाठी हालचाली सुरू होत्या. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे या प्रयत्नांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे संजयकाकांची पुढील वाटचाल कोणत्या दिशेने होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.