yuva MAharashtra सांगली काँग्रेसमध्ये नवचैतन्याची चाहूल; बूथपासून बांधणीस सुरुवात - मा. आ. रामहरी रूपनवर

सांगली काँग्रेसमध्ये नवचैतन्याची चाहूल; बूथपासून बांधणीस सुरुवात - मा. आ. रामहरी रूपनवर


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २४ एप्रिल २०२५

"धूळ झटकून पुन्हा उभारी घ्यायची वेळ आली आहे," अशा शब्दांत काँग्रेस पक्षाच्या नव्या बांधणीचा इशारा जिल्हा निरीक्षक व माजी आमदार रामहरी रूपनवर यांनी दिला. जिल्ह्यातील विविध पदांसाठी पात्र इच्छुकांची यादी दोन दिवसांत प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली जाणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि सहनिरीक्षक आदित्य पाटील देखील उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे वजन वाढले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांनीही हालचाली वाढवल्या असून काँग्रेसने थेट मैदानात उतरायचा निर्णय घेतला आहे. यासाठी पक्षाने बूथस्तरावरूनच नव्याने संघटन बांधणीस प्रारंभ केला आहे.

दरम्यान, अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्याबाबत सुरू असलेल्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर उत्तर देताना रूपनवर म्हणाले, "विशाल पाटील हे काँग्रेससोबतच आहेत आणि ते पक्षाचे शंभरावे खासदार आहेत."

राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना रूपनवर म्हणाले, "सध्याची स्थिती मुघल व ब्रिटीश काळापेक्षाही बिकट आहे. धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडली जात आहे. मात्र जनतेत नाराजी वाढत असून लोकशाही पुन्हा सावरण्याचे काम काँग्रेसच करेल आणि त्या नेतृत्वाची धुरा राहुल गांधी सांभाळतील."


बंडखोरीला थारा नाही

काँग्रेस उमेदवारांविरोधात पक्षातून बंडखोरी करणाऱ्यांविषयी कठोर भूमिका घेत, अशा व्यक्तींना संघटनेत स्थान नाकारले जाईल, असा इशारा देखील रूपनवर यांनी दिला. संबंधितांवर कारवाईची जबाबदारी प्रदेश काँग्रेसकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपकडून दबावतंत्राचा वापर

बैठकीदरम्यान सांगली व मिरजेतील अनेक माजी नगरसेवक गैरहजर राहिल्याचे दिसून आले. यावर प्रतिक्रिया देताना रूपनवर म्हणाले, "भाजपकडून दबाव व भीती निर्माण केली जात आहे. त्यामुळे काहीजण पक्ष सोडत आहेत. ही परिस्थिती चिंताजनक आहे."