yuva MAharashtra आनंदीयात्री...

आनंदीयात्री...


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. २४ एप्रिल २०२५

श्रीमद्भागवत महापुराणामध्ये कुंती आणि श्रीकृष्णाच्या संवादाची एक कथा आहे. ज्यामध्ये कुंती श्रीकृष्णाकडे भेट म्हणून दुःख मागते. या जगावेगळ्या मागणीचे कारण विचारताना कुंती सांगते, दुःखामध्ये परमेश्वर श्रीकृष्णाचे नित्य स्मरण राहील. एका अर्थाने दुःख मागण्याच्या निमित्ताने कुंती परमेश्वराच्या आठवणीतून मिळणा-या सत् चित् आनंदी जीवनाची मागणी करत असते.

कुंतीप्रमाणे आपणा सर्वांनाही जीवनात सतत आनंद हवा असतो. परंतु, दैनंदिन जीवनात आपल्या मनाविरूद्ध अनेक घटना घडत असतात. त्यामुळे दुःखी होऊन जीवनातील आनंदाचे क्षण आपण गमावत असतो. कुंती ज्ञानी होती. सार नसलेल्या या घोर असार अशा संसारात दुःख असले तरी सुख, आनंद आहे आणि ते कसे प्राप्त करायचे याचे ज्ञान कुंतीला होते. आजच्या ताणतणावाच्या, जीवघेण्या स्पर्धेच्या, धावपळीच्या काळातही हे ज्ञान कांही लोकांना आहे. असे ज्ञानी लोक वरवर पाहाता इतर अनेकांप्रमाणे सर्वसामान्य असतात. परंतु ते आपल्या जीवनाचा प्रवास, दुःखमय, कष्टाचा, कंटाळवाणा, निरस, न बनवता आनंदाची यात्रा बनवून आनंदीयात्रेतील एक वारकरी होतात आणि स्वतः आनंदयात्री बनतात.


अशा कांही आनंदयात्रींच्या जीवनकथा व दैनंदिन आचरण इतरांपर्यंत पोहचवणारे एक पुस्तक, “आनंदयात्री.” श्री जयंत कुलकर्णी यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. गेली पंधरा वर्षे सातत्याने जयंत कुलकर्णी लेखन करत असून त्यांचे लेख, कथा, अनेक साप्ताहिके, पाक्षिके, मासिक आणि दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाल्या आहेत. शिवाय ‘शॉपिजन प्रकाशन’ संस्थेकडून त्यांचे “श्री गजानन कथासागर” हे २०२३ च्या सर्वाधिक लोकप्रिय कथासंग्रहापैकी एक पुस्तक, आणि “स्वातंत्र्याचे शिल्पकार भाग एक ते तीन” ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या या लेखनाचे कौतुक ‘शॉपिजन व तितिक्षा इंटरनॅशनल’कडून पुरस्काराच्या स्वरूपात केले गेले आहे.

श्री. जयंत कुलकर्णीं यांच्या “आनंदयात्री” या पुस्तकात कांही चरित्र कथा, बालपणीच्या आठवणी सांगणाऱ्या कथा, विदेश पर्यटन कथा, आणि जीवनात त्यांना भेटलेल्या व्यक्ति, घडलेले प्रसंग, घटना, आणि त्यातून मिळालेल्या अनुभवातूनच मानवी जीवनासंबधी त्यांना शिकायला मिळालेले खुप कांही शब्दरूप केले आहे. 

उदाहरणार्थ, “स्वांत सुखाय” आणि “औदार्य, आत्मसन्मान आणि आनंदी आयुष्य - ज्येष्ठांचे,” या दोन कथामध्ये आजच्या वृद्धांच्या समस्या मांडल्या असुन वृद्धांनी आनंदी जीवनासाठी कसे वागावे हे सांगितले आहे. त्यासोबत, वृद्धांच्यासाठी असलेल्या सरकारी आर्थिक योजना आणि सवलतींची माहितीही दिली आहे.

 “ निमंत्रण ” ही कथा अपघातात एक हात निकामी झालेल्या विधुर वडिलांना आधार मिळावा यासाठी त्यांचा तरूण मुलगा कसा वागतो, काय करतो हे सांगते.  

पुस्तकात, “वात्सल्यसिंधू आई” आणि “राजा माणूस : विनय लक्ष्मण करमरकर” या दोन चरित्र कथा आहेत. जीवनाचा प्रवास आनंदयात्रा होण्यासाठी रोजच्या जीवनातील आदर्श आचरणाची कल्पना “वात्सल्यसिंधू आई” या कथेतून येते. या कथेतील एक परिच्छेद पुढे दिला आहे. 

“स्वभाव आनंदी असल्याने तिच्या बरोबर राहणे हा आनंद सोहळा होता. लोकांना खाऊ-पिऊ घालण्यात, मदत करण्यात तिला आनंद मिळायचा. स्वतःसाठी म्हणून ती जगलीच नाही. पाणी जसं कोणत्याही रंगात मिसळून जातं तसचं तिचं होत. कोणाशीही ती जमवून घ्यायची. तिला स्वतःचा इगो नव्हता. आपली मतं तिने कधी कोणावर लादली नाहीत. तिला पैशांचा, दागिन्यांचा मोह नव्हता. नटण्या-मुरडण्याची आवड नव्हती. आयुष्यात तिने तोंडाला पावडर लावली नाही. कधी पार्लरमध्ये गेली नाही. देवानेच तिचा चेहरा एखाद्या देवीसारखा घडवला होता. 

अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेह-यावर तसचं तेज होतं. स्वतःसाठी तिने कधीच काही मागितलं नाही... निस्वार्थ प्रेम करणं, सदैव आनंदी आणि उत्साही असणं, सगळ्यांबद्दल आदर प्रेम असणं, सकारात्मक विचार, सकारात्मक उर्जा, अतिथीला जेवायला घालून तृप्त करून पाठवणं, उत्तमाचा ध्यास हे तिचे गुण आम्हा मुलांना आणि पुढील पिढीला नक्कीच आत्मसात करण्यासारखे आहेत.” 

“राजा माणूस : विनय लक्ष्मण करमरकर” ही कथा माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला हे जाणणे महत्वाचे आहे हा संदेश देते. या पुस्तकातील “योद्धा” कथा खाजगी हॉस्पीटलमध्ये मेल नर्सचे काम करणाऱ्या महेशच्या जीवनाची आहे. या कथेतील महेश हॉस्पीटलमधील पेशंट आणि इतर सर्वांशी मनमिळाऊपणे वागत, त्यांना आवश्यक सर्व मदत करत असतो. अशा प्रकारे सेवाभावी वृत्तीने काम करणारा महेश करोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस रूग्णांची सेवा करत आपल्या आयुष्याचे बलिदान देऊन आनंदयात्री बनतो. 

मनाला चटका लावणारी अशीच एक कथा “जिवलगा कधी रे येशील तू.” ही पूर्ण वाचनीय तर आहेच पण त्या बरोबर विचार करायलाही भाग पाडते. विशेषतः या कथेतील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर विभूती संकर घोंडियाल यांची पत्नी आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नोकरीदाखल होते, हे वाचून या वीरांगणेला सॅल्यूट केल्याशिवाय मन राहवतच नाही. 

अशा या कथांसोबत या पुस्तकात बालपणी शाळेची जमीन शेणाने सारवण्यामागे दडलेला आनंद, परिक्षेत मिळालेले बक्षिस, किंवा हादग्याची खिरापत ओळखणे, बहिण-भावांशी केलेली मारामारी, आणि सुंदर मखमली बैठकीची, पडदे असलेली डौलदार सारवट बैलगाडीतुन केलेली सैर अशा छोट्याछोट्या घटना, प्रसंगातून मिळालेल्या मोठ्या आनंदाच्या बालपणीच्या आठवणीच्या कथाही आहेत. शिवाय कांही कथा विदेश पर्यटन करताना भेटलेल्या व्यक्ति, घडलेले प्रसंग, घटना, आणि जीवनातील अनुभवाच्या आहेत.

पुस्तकातील या कथा श्री. जयंत कुलकर्णीनी रोजच्या व्यवहारात वापरलेल्या जाणा-या मैत्रीच्या भाषेत लिहील्या आहेत. एकूण तीस कथांच्या या पुस्तकांची छापील किंमत रू. २६०/- आहे. लेखक श्री. जयंत शंकर कुलकर्णी, डी-७०५, मधुकोष अपार्टमेंट, सिंहगड रोड, धायरी फाटा, भगवती पॅलेसजवळ, पुणे - ४११०६८, भ्रमणध्वनी - ९४२३५३४१५६ यांचेशी संपर्क साधला असता या पुस्तकाची एक प्रत रू. २००/- अधिक पोस्टेज आणि दहापेक्षा अधिक प्रती प्रत्येकी रू. १६०/- सवलतीच्या दरात रसिक वाचकांना मिळू शकतील. या शिवाय ‘शॉपिजन प्रकाशन’ संस्थेकडुन प्रकाशित झालेले “श्री गजानन कथासागर” हे पुस्तक, आणि “स्वातंत्र्याचे शिल्पकार भाग एक ते तीन” व आनंदयात्री अशा पाच पुस्तकांचा रू. १३९०/- रूपयांचा संच रू.१,०००/- सवलतीच्या किंमतीतही मिळू शकेल. ही सर्व पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरतील अशी खात्री लेखकाला आहे.