yuva MAharashtra "पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जलजागृती ही काळाची गरज" – पोलीस अधीक्षक संदीप घुगे

"पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जलजागृती ही काळाची गरज" – पोलीस अधीक्षक संदीप घुगे


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ एप्रिल २०२५

सध्या उपलब्ध असलेल्या जलस्रोतांचा शाश्वत वापर करण्यासाठी जनजागृती अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले. त्यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग योग्य रीतीने केला, तर मर्यादित साधनसंपत्तीमध्येही उत्तम परिणाम साधता येतो. आगामी काळात जलसंपदा विभागाने या तंत्रज्ञानाचा अंगीकार केल्यास जलव्यवस्थापन अधिक प्रभावी होईल. 'प्रत्येक थेंबातून अधिक उत्पादन' हे सरकारचे धोरण आहे आणि त्यामुळे पाण्याचा थेंबही जपून वापरणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

वारणाली (जि. सांगली) येथे जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या उद्घाटनप्रसंगी घुगे बोलत होते. या कार्यक्रमाला सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. व्ही. आजगेकर, भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भू-वैज्ञानिक सुजाता सावळे, कृषी अधिकारी विवेक कुंभार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे आणि कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष श्री. कोल्हे हे मान्यवर उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक घुगे यांनी यावेळी सांगितले की, पोलीस ठाण्यांमध्ये पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. तसेच नागरिकांनीही आपल्या परिसरातील लोकांमध्ये जलसंकटाविषयी जागृती केली पाहिजे, जेणेकरून भविष्यात पाण्याची टंचाई उद्भवणार नाही. जलसंपदा विभागाच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलिसांची मदत घेतली जाईल, असे सांगत त्यांनी पाणीचोरीच्या घटनांबाबत तत्काळ कळविण्याचे आवाहन केले.


2024 मध्ये सांगली जिल्ह्यात महापुरासारखी स्थिती निर्माण झाली नाही, यामागे पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरण प्राधिकरणासोबत केलेले योग्य नियोजन कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर्षीही तसेच समन्वयाने काम करण्याचे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमात कार्यकारी अभियंता एम. एम. रासनकर यांनी जलसंपत्तीच्या काटेकोर वापरावर भर देत, कृती पंधरवड्यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे सांगितले.

कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी शेतीमध्ये कमी पाण्यावर अधिक उत्पादन घेण्याकडे लक्ष देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रास्ताविकात अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी 15 ते 30 एप्रिल दरम्यान राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्यातील सिंचन व्यवस्थेची सुरुवात ब्रिटिशकालीन कृष्णा कालव्यापासून झाली असून, ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू अशा प्रमुख योजनांमधून सिंचनक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. 2023 मध्ये या योजनांच्या माध्यमातून एकूण सुमारे 50 टीएमसी पाणी वापरून साडेतीन लाख हेक्टर जमीन सिंचित करण्यात आली. यामुळे दुष्काळी भागातील जलसाठे सुधारले असून, विभाग सातत्याने या दिशेने कार्यरत आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची सुरुवात पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते सिंचन लाभक्षेत्र नकाशाच्या पाहणीने झाली. त्यानंतर कलशपूजन व दीपप्रज्वलन झाले. संगीता मोरे यांनी सूत्रसंचालन केले तर रोहित कोरे यांनी आभार मानले. जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.