| सांगली समाचार वृत्त |
बुधवार दि. १६ जुलै २०२५
आजवर सत्य मांडणं हा पत्रकारितेचा आत्मा मानला जातो. पण सध्याच्या राजकीय आणि सामाजिक वास्तवात हीच गोष्ट काहींच्या मते "गुन्हा" ठरवली जात आहे. कारण प्रामाणिक पत्रकारितेमुळे अनेक मुखवटे उतरतात, खरे चेहरे उघडे पडतात.
महाराष्ट्रात स्नेहा बर्वे या महिला पत्रकारावर रॉडनं हल्ला होतो, तर बिहारमध्ये अजीत अंजूम यांच्यावर निवडणूक आयोग एफआयआर दाखल करतो — केवळ यासाठी की त्यांनी लोकांच्या डोळ्यात झणझणीत सत्य टाकणारी बातमी मांडली!
अजीत अंजूम – निर्भीड पत्रकारितेचा चेहरा
प्रिंटपासून इलेक्ट्रॉनिक ते डिजिटल मीडिया असा अजीत अंजूम यांचा प्रवास. सत्तेच्या सुळ्यावर प्रश्न विचारणारा हा आवाज लोकशाहीसाठी झगडतोय. त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून त्यांनी बिहारमधील मतदार नोंदणी प्रक्रियेतील घोळ उघडकीस आणला. आयोगाने घोषित केलेली प्रक्रिया प्रत्यक्षात राबवली जात नसल्याचं त्यांनी दाखवून दिलं. हा व्हिडिओ हटवण्याचा दबाव आला, पण त्यांनी तडजोड न करता तो टिकवून ठेवला. आणि नेमकी हीच गोष्ट सत्ताधाऱ्यांना खटली.
खोट्या आरोपांची चढाई
बिहारमधील बेगुसराय येथे त्यांच्या विरोधात सरकारी अडथळा, अवैध प्रवेश आणि जातीय वातावरण निर्मितीचे आरोप लावले गेले. अशा प्रकारे पत्रकारांना दडपण्याचा प्रयत्न नवा नाही. यापूर्वी ‘4 पीएम’ चॅनललाही बंद करण्यात आलं होतं. हे सर्व त्या पत्रकारांच्या वाट्याला येतं जे "सरकारच्या रेषेत चालत नाहीत".
महाराष्ट्रातील स्थितीही वेगळी नाहीराज्यात पत्रकारांवरचे हल्ले हे आता जणू नित्याचेच झाले आहेत. पत्रकार संरक्षण कायदा फक्त कागदावर आहे. अंमलबजावणीसाठी सतत मागण्या होत आहेत, पण सरकारकडून केवळ वेळकाढूपणा सुरू आहे. अशातच सत्य मांडणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होतात, ते मार खातात, पण सरकार केवळ बघ्याची भूमिका घेतं.सत्याचा आवाज कोणीही दाबू शकत नाहीरवीश कुमार, पुण्यप्रसून वाजपेयी, अभिसार शर्मा, ध्रुव राठी, अजीत अंजूम हे असे काही पत्रकार आहेत जे सरकारी गोदी मिडियाच्या पार्श्वभूमीवर जनतेसमोर दुसरी बाजू मांडत आहेत. त्यांना लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. त्यामुळेच सरकारसाठी ते डोकेदुखी ठरत आहेत.
दडपशाहीला झुगारून पत्रकारांचा निर्धार
तुषार खरात यांचा दाखला घ्या — एका मंत्र्याविरोधात ठाम भूमिका घेतल्यामुळे त्यांना तीन महिने तुरुंगवास भोगावा लागला, पण त्यांनी पत्रकारिता सोडली नाही. आजही त्याच जिद्दीने ते सत्य मांडत आहेत. अशा शेकडो उदाहरणांनी हे स्पष्ट होते की पत्रकारांना दबावात आणण्याचा हा खेळ थांबणार नाही, पण त्यांचं लेखणीवरचं प्रेमही कमी होणार नाही.
एकजुटीचा निर्धार
आजही आम्ही अजीत अंजूम यांच्याबरोबर ठामपणे उभे आहोत. त्यांच्यावर दाखल केलेली एफआयआर ही केवळ भय निर्माण करण्याची एक कृती आहे, आणि आम्ही तिचा तीव्र निषेध करतो. पत्रकारिता गुन्हा नाही. ती लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, आणि या स्तंभावर कुणीही घाला घालू शकत नाही!
एस. एम. देशमुख
मुख्य विश्वस्त
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद