| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शनिवार दि. १९ जुलै २०२५
परवाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठाम भूमिका घेत, या पवित्र सभागृहाची शिस्त अबाधित ठेवण्याचे महत्व अधोरेखित केले. अंतिम आठवड्याच्या चर्चेच्या उत्तरादरम्यान बोलताना त्यांनी विधानसभेत झालेल्या वादावादीबाबत तीव्र खंत व्यक्त केली आणि ती केवळ आमदारांची नाही, तर जनतेची जागा असल्याचे ठामपणे सांगितले.
गुन्हेगारांचा प्रवेश चिंताजनक
गोपीनाथ पडळकर व जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीकडे लक्ष वेधताना फडणवीस म्हणाले की, सभागृहाच्या परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची उपस्थिती ही गंभीर बाब आहे. ऋषिकेश टकलेवर सहा तर नितीन देशमुखवर आठ गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "या प्रकारामुळे सभागृहाची प्रतिष्ठा धोक्यात येते," असे सांगत त्यांनी प्रत्येक आमदाराने आपल्यासोबत येणाऱ्या व्यक्तीबाबत जबाबदारी घेतली पाहिजे, असे स्पष्ट केले.
ओळखपत्र सक्तीचे – महत्त्वाचा निर्णयमुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, विधीमंडळाच्या परिसरात कुणीही विनाबिल्ली प्रवेश करणे योग्य नाही. "कोणत्याही पाहुण्याला बिल्ला असणे आवश्यक आहे आणि प्रत्येक जण गळ्यात ओळखपत्र घालून यायला हवा," अशा सूचना देत त्यांनी सुरक्षा यंत्रणेच्या मजबुतीकरणावर भर दिला. "भविष्यात एखादी गंभीर घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पडळकर यांचा खेद व्यक्त, आव्हाडांची स्पष्टता
गोंधळानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात उभे राहून घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आश्वासन दिले. दुसरीकडे, जितेंद्र आव्हाड यांनी, "मी सभागृहात एकटाच येतो, कोणाच्या पासवर सही करत नाही. घटनेच्या वेळी मी सभागृहात नव्हतो," असे स्पष्ट करत आपली भूमिका मांडली.
विरोधकांवर अप्रत्यक्ष टोला – मर्यादा पाळा
मुख्यमंत्र्यांनी शेवटी विरोधकांकडून होणाऱ्या अशोभनीय वक्तव्यांवर नाराजी व्यक्त करत म्हटले, "शब्दांतूनही विष निघते – ते नागाच्या विषापेक्षाही घातक असते. मतभेद असू शकतात, पण संवादाची पातळी जपली पाहिजे. माध्यमांसमोर अश्लील घोषणांनी सभागृहाची प्रतिमा मलीन होते."