yuva MAharashtra IIT, NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोचिंगवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्राची पावले

IIT, NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोचिंगवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्राची पावले


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - शनिवार दि. २१ जून २०२५

विद्यार्थ्यांनी कोचिंगवर होणारे वाढते अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंत्रालयाने नुकतीच ९ सदस्यीय समिती स्थापन केली असून, ही समिती शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या अडचणींवर उपाय सुचवणार आहे. शालेय शिक्षणात नेमके काय बदल करावेत, जेणेकरून विद्यार्थी कोचिंगशिवायही स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी ठरतील, याचा अभ्यास ही समिती करणार आहे.

समितीची रचना आणि उद्दिष्टे

या समितीचे अध्यक्षत्व उच्च शिक्षण विभागाचे सचिव डॉ. विनीत जोशी करत आहेत. यामध्ये सीबीएसईचे अध्यक्ष, शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे सहसचिव, IIT मद्रास व IIT कानपूरचे प्रतिनिधी, NIT त्रिची, NCERT, केंद्रीय व नवोदय विद्यालयांचे प्राचार्य आणि खाजगी शाळेतील एक प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

डमी शाळांचा वाढता कल – चिंतेचा विषय

गेल्या काही वर्षांत 'डमी स्कूल' म्हणजेच फक्त नावापुरते शाळेत नाव असलेले आणि प्रत्यक्ष शिक्षण कोचिंग संस्थांत घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. विद्यार्थ्यांना वाटते की फक्त कोचिंग क्लासद्वारेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते, हे चित्र खूप गंभीर बनले आहे.


शालेय शिक्षणात नवचैतन्याची गरज

शिक्षणतज्ज्ञ देव शर्मा यांच्या मते, समिती शालेय अभ्यासक्रमातील कमतरता, रटाळ पद्धतीने शिकवणे (रोट लर्निंग), आणि अभ्यासात गोंधळाची भावना यावर विशेष भर देणार आहे. शालेय शिक्षण अधिक विचारप्रवृत्त, विश्लेषणात्मक आणि रुचकर कसे बनवता येईल, याचे मार्गही समिती सुचवणार आहे. याशिवाय, 'डमी स्कूल कल्चर' का वाढते आहे आणि ते थांबवण्यासाठी काय उपाय योजता येतील, याचा अभ्यास देखील समिती करणार आहे.

विद्यार्थ्यांचे मानसिक ओझे कमी करणे, त्यांच्या नैसर्गिक शिकण्याच्या प्रवृत्तीला चालना देणे आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी कोचिंगवर होणारे अवलंबित्व कमी करणे — या दिशेने केंद्र सरकारचा हा महत्त्वाचा प्रयत्न मानला जात आहे.