yuva MAharashtra 'अटी'तटीच्या ऐरणीवर मनसे-ठाकरे गट युतीची चर्चा, 'स्थानिक'च्या निवडणुकीत रंगत की रंगभंग ?

'अटी'तटीच्या ऐरणीवर मनसे-ठाकरे गट युतीची चर्चा, 'स्थानिक'च्या निवडणुकीत रंगत की रंगभंग ?

फोटो सौजन्य : gettyimage 

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - गुरुवार दि. ५ जून २०२५

महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसे यांच्यातील संभाव्य युतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच गाजत आहे. दोन्ही पक्ष एकत्र येणार का, हा प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

अलीकडेच आदित्य ठाकरे यांनी, "महाराष्ट्राच्या हितासाठी कोणत्याही पक्षासोबत एकत्र येण्यास आम्ही तयार आहोत," असे स्पष्ट करत मनसेसोबत युतीबाबत सकारात्मक भूमिका घेतली. त्यानंतर शिवसेनेतील काही वरिष्ठ नेत्यांनीही मनसेसोबत युतीसाठी आपली तयारी दर्शवली आहे. संजय राऊत, अनिल परब, सुनील प्रभू, अंबादास दानवे आणि सुषमा अंधारे यांनी माध्यमांपुढे सकारात्मक संकेत दिले आहेत.

दुसरीकडे, मनसेकडून मात्र अजून स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. राज ठाकरे यांनी एप्रिलमध्ये दिलेल्या मुलाखतीत युतीबाबत सूचक भाष्य केल्यानंतरच या चर्चेला प्रारंभ झाला. पण नंतर त्यांनीच स्पष्ट केलं की त्यांच्या वक्तव्याचा अर्थ प्रत्येकाने वेगळा घेतला आहे.

मनसेतील काही नेत्यांनी देखील युतीबाबत कोणतीही ठोस भूमिका घेण्याऐवजी, “योग्य वेळी योग्य निर्णय राज ठाकरे घेतील,” अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे ठाकरेंकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाला अद्याप मनसेकडून ठोस उत्तर मिळालेलं नाही.


युतीसाठी अटी ठरतील का अडथळा?

उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी काही अटी पुढे केल्या आहेत, जसे की – मनसेने महायुतीसोबत असलेले संबंध पूर्णपणे तोडावेत. कारण सध्या मनसे आणि महायुतीमधील जवळीक ही एक प्रमुख अडचण ठरत आहे. त्यामुळे मनसे या अटींवर सहमती दर्शवते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पडद्यामागे हालचाली सुरू?

या युतीसंदर्भात कुणी मध्यस्थी करतंय का, दोघे भाऊ थेट चर्चेला बसणार का, की माध्यमांतच ही चर्चा मर्यादित राहणार? हे प्रश्नही आता उपस्थित होत आहेत. युती होणार की नाही, हे अजून स्पष्ट नसले तरी, राजकीय वर्तुळात यामुळे खळबळ नक्कीच उडाली आहे.

कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

शिवसेनेच्या गटाकडून स्पष्ट "हो" मिळाल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा मनसेच्या उत्तराकडे लागल्या आहेत. कार्यकर्तेही मनापासून वाट पाहत आहेत – एक टाळी वाजलीय, आता प्रतिसाद मिळतो का?