| सांगली समाचार वृत्त |
हैदराबाद - गुरुवार दि. ५ जून २०२५
पाकिस्तानला परदेशात दहशतवाद्यांना दिल्या जाणाऱ्या पाठींब्यावर ठोस भूमिका मांडल्यानंतर AIMIM चे नेते असदुद्दीन ओवैसी भारतात परतले आहेत. ते अलीकडेच सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि अल्जेरिया या देशांच्या दौऱ्यावर भारतीय बहुपक्षीय शिष्टमंडळासोबत होते.
या भेटी दरम्यान त्यांनी "ऑपरेशन सिंदूर" संदर्भात पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर ठाम भूमिका मांडत त्या देशांमध्ये भारताचे मत स्पष्ट केले. भारतात परतल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा पाकिस्तानवर सडकून टीका केली.
परदेशात भारतासाठी भूमिका, भाजपसाठी नाही
ओवैसी म्हणाले, "आम्ही परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेलो होतो, कोणत्याही पक्षासाठी नव्हे. भारताची भूमिका आणि समस्या जागतिक स्तरावर मांडण्याचा आमचा प्रयत्न होता. आम्ही पंतप्रधान मोदींसाठी नव्हे, तर देशासाठी गेलो होतो."
ते पुढे म्हणाले, "जेव्हा पाकिस्तानशी संवाद साधण्याचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा आम्ही उदाहरणांसहित सांगितले की, २६/११ च्या मुंबई हल्ल्यापासून पठाणकोटपर्यंत, आम्ही संवादाचा मार्ग स्वीकारला. पण पाकिस्तानकडून फक्त फसवणूक झाली. आम्ही पुरावे सादर केले – जसे की, टीआरएफकडून पाठवलेले ईमेल पाक लष्करी छावण्यांच्या परिसरातून पाठवले गेले होते."
दहशतवादाला आर्थिक फाटा:
ओवैसी यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्कच्या आर्थिक मुळांवर बोट ठेवत सांगितले की, “त्यांची बेकायदेशीर आर्थिक प्रणाली दहशतवादाचे मुख्य कारण आहे. म्हणूनच MENAFATF देशांनी पाकिस्तानला पुन्हा FATF च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याच्या भारताच्या मागणीला पाठिंबा द्यावा.”
भारताचा आवाज जागतिक व्यासपीठावर
२०१८ मध्ये भारताने जेव्हा पाकिस्तानविरुद्ध FATF यादीचा मुद्दा उचलला होता, तेव्हा अनेक आखाती देशांनी पाठिंबा दिला होता. आता पुन्हा भारताला पाकिस्तानच्या दहशतवादी भूमिकेचा भांडाफोड करायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपविरोधी भूमिका ठाम
"भाजपविरोध आमचा राजकीय आधार असून तो कायम राहणार आहे. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत भाजपच्या राजकारणाचा विरोध करत राहू," असेही ओवैसी यांनी स्पष्ट केले.