yuva MAharashtra सांगलीच्या मिनी मंत्रालयाची सत्तेची चावी खानापूरकरांच्या हाती

सांगलीच्या मिनी मंत्रालयाची सत्तेची चावी खानापूरकरांच्या हाती


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. १५ जून २०२५

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगू लागली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग पुनर्रचनेचे आदेश शासनाकडून देण्यात आले असून, प्रशासन स्तरावर याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

सांगली जिल्हा परिषदेसाठी २०१७ मध्ये ६० जागा होत्या. मात्र यंदा एक गट वाढवून ही संख्या ६१ करण्यात आली आहे. ही नवीन गटरचना खानापूर मतदारसंघात समाविष्ट होणार असून, त्यामध्ये एक नवीन गट व दोन नवीन गणांची भर पडणार आहे. यानुसार जिल्हा परिषदेसाठी ६१ गट व पंचायत समित्यांसाठी १२२ गण निश्चित होणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने २०२२ पूर्वीच्या स्थितीनुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर ग्रामविकास विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रभाग रचना करण्याचे आदेश कालच जारी केले. या आधारे २०१७ मधील गट व गणांची मर्यादा लक्षात घेऊन नवी प्रारूप रचना करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या सीमारेषा शक्यतो न फोडता ही रचना केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पूर्वी महाविकास आघाडीच्या कालखंडात करण्यात आलेल्या रचनेत जिल्हा परिषदेचे ६८ गट आणि पंचायत समित्यांचे १३६ गण होते. त्यावर आरक्षणही जाहीर झाले होते. मात्र ओबीसी आरक्षणावरील कायदेशीर वादामुळे ही प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता न्यायालयाच्या नव्या आदेशानुसार गटांची संख्या कमी करून ती ६१ वर आणली आहे.

खानापूर तालुक्यातील नागेवाडी, लेंगरे आणि भाळवणी या पूर्वीच्या गटांमध्ये आता खानापूर नावाचा नवीन गट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात नव्या रचनेनुसार निवडणूक प्रक्रिया ६१ गट आणि १२२ गणांमध्ये पार पडणार आहे.


प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्याचे प्रकाशन १४ जुलै रोजी अपेक्षित आहे. त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी नागरिकांना २१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी या सूचना आणि हरकती विभागीय आयुक्तांकडे २८ जुलैपूर्वी सादर करतील. ११ ऑगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांकडून सुनावणी करून अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर १८ ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळणार आहे.

राजकीय पक्ष, स्थानिक नेते आणि इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली असून, प्रभाग आरक्षणाची वाट पाहत संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता वाढली आहे. सांगली उत्तर भागात तर पक्षापेक्षा वैयक्तिक अस्तित्वासाठीचे राजकीय घडामोडीही तापू लागल्या आहेत.