| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. १५ जून २०२५
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, तसेच इतर विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सात दिवसांपासून सुरू केलेलं उपोषण अखेर मागे घेतलं आहे. अमरावतीत सुरु असलेल्या या उपोषणाच्या सातव्या दिवशी त्यांनी सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन थांबवलं.
या निर्णयाआधी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली होती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट फोनवरून संवाद घडवून आणला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती गठित केली जाईल आणि या समितीत बच्चू कडू यांचा समावेश असेल, असं स्पष्ट केलं होतं. मात्र, समिती स्थापन होण्याचा ठोस कालावधी जाहीर केला नव्हता, यामुळे बच्चू कडू उपोषणावर ठाम राहिले होते.
यानंतर आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांची भेट घेतली. सामंत यांनी सरकारकडून दिलेलं अधिकृत पत्र सादर केलं, ज्यात पुढील १५ दिवसांत कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल आणि त्यानंतर अहवालाच्या आधारे निर्णय घेतला जाईल, असं नमूद होतं.
हे आश्वासन मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी उपोषण संपुष्टात आणलं, पण यासोबतच त्यांनी सरकारला ठोस चेतावणी दिली आहे – २ ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख जाहीर झाली नाही, तर मंत्रालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी बोलताना कडू म्हणाले, "मुख्यमंत्री सुरुवातीला कर्जमाफीच्या मुद्द्यावर गप्प होते, पण आता त्यांनी भाष्य केलं आहे. ही आमच्या आंदोलनाची मोठी सकारात्मक फळं आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ९० टक्के यश मिळवले असून दिव्यांगांच्या २० प्रमुख मागणाही मान्य करण्यात आल्या आहेत."