yuva MAharashtra भाषिक विकास म्हणजे साहित्य संमेलन; प्रा. डॉ. तारा भवाळकर यांचे ३० व्या वसंत व्याख्यानमाला उद्‍घाटनप्रसंगी प्रतिपादन

भाषिक विकास म्हणजे साहित्य संमेलन; प्रा. डॉ. तारा भवाळकर यांचे ३० व्या वसंत व्याख्यानमाला उद्‍घाटनप्रसंगी प्रतिपादन


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १० जून २०२५ 

‘भाषिक विकास म्हणजे साहित्य संमेलन होय. समाजात एकारलेपण येऊ नये, तसेच शारिरीक, मानसिक, बौद्धिक, कलात्मक विकास व्हावा. सुसंस्कृत आणि संवेदनशील समाज घडावा, यासाठी साहित्य संमेलनाची गरज आहे.’’ असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष, प्रा. तारा भवाळकर यांनी केले. त्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वि. स. खांडेकर वाचनालयातर्फे ३० व्या वसंत व्याख्यानमालेत बोलत होत्या.

सांगली विश्रामबाग येथील स्त्री सखी महिला मंडळ हॉलमध्ये काल दि ९/६/२०२५ सायंकाळी प्रा. डॉ. तारा भवाळकर हस्ते व्याख्यानमालेचे उद्‍घाटन झाले. अध्यक्षस्थानी आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ यांची उपस्थिती होती.


यावेळेस बोलता प्रा. भवाळकर म्हणाल्या की, ‘‘माणसांना आवाजाची सोबत हवी असते, म्हणूनच अनेकांना मोबाईल जवळचा वाटू लागला आहे. मनामध्ये साचलेले बोलत राहिले पाहिजे, ह्या मताची मी आहे. कथा, उखाणे, गाणी, कोडी या माध्यमातून बाईने भाषा वाढवली. महिलांनी परंपरेच्या अनुभवातून समाज घडवला. बरीच गाणी श्रम हलके करताना निर्माण झाली आहेत. पुर्वी राजांच्या दरबारातील चर्चा ही देखील साहित्य संमेलनाचे पूर्वरुप आहे."


आपले विचार व्यक्त करताना प्रा. भवाळकर म्हणाल्या की, "लिहिता, वाचता आल्याने शिक्षण, शहाणपण मिळते असे नाही, ते न येणाऱ्यांचे साहित्य सुद्धा मोठे आहे. संत, पंत, तंत ह्या परंपरा आहेत, ह्या पुर्वापार चालत आल्या आहेत. शहाणपण आणि आनंद मिळवायचा असेल, भाषिक आणि सांस्कृतिक विकास महत्वाचा आहे. लिखीत, मौखिक, कलांच्या माध्यमातून होणारा विकास हे साहित्यच असते.’’ असे मत प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले आहे.


शेवटी प्रा. भवाळकर यांनी आचार्य जावडेकर यांचे जेलमधील पत्रांचे पुस्तक वाचनालयास भेट दिले. पाहुण्यांचे स्वागत व प्रस्ताविक चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांनी केले. सुत्रसंचालन विजय कडणे यांनी तर आभार उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी मानले. प्र. ग्रंथपाल शंकर भंडारी सहा आयुक्त सहदेव कावडे ,नकुल जकाते ,धनंजय हर्षद जन संपर्क अधिकारी , सहा ग्रंथपाल राहुल मुळीक मनपा कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती होती.