| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जून २०२५
सध्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट ढासळले आहे. विशेषतः खाद्यतेलाच्या वाढत्या दरांमुळे गृहिणींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी कस्टम ड्युटीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने कच्च्या पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल यावरील मूळ सीमा शुल्क म्हणजेच बेसिक कस्टम ड्युटी 20 टक्क्यांवरून थेट 10 टक्क्यांपर्यंत खाली आणली आहे. या निर्णयामुळे लवकरच बाजारात खाद्यतेलाचे दर घसरण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकात सांगण्यात आले की, 31 मेपासून हा बदल लागू होणार आहे. भारतात 70 टक्क्यांहून अधिक खाद्यतेल परदेशातून आयात होते. यामध्ये इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड येथून पाम तेल, तर अर्जेंटीना, ब्राझील, रशिया आणि युक्रेनमधून सोयाबीन व सूर्यफूल तेलाची आयात होते. आयात शुल्क कमी झाल्यामुळे या तेलांची देशांतर्गत किंमत नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा आहे.
किती झाला करात बदल ?
कच्च्या पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील कस्टम ड्युटी 20% वरून 10% करण्यात आली आहे.
याशिवाय या तेलांवरील एकूण आयात शुल्क 27.5% वरून 16.5% इतके कमी करण्यात आले आहे.
याआधी सप्टेंबर 2024 मध्ये सरकारने रिफाइंड आणि कच्च्या वनस्पती तेलांवर 20% सीमा शुल्क लागू केले होते. तेव्हा याच तीन प्रमुख तेलांवरील आयात शुल्क 27.5% होते, जे पूर्वी केवळ 5.5% इतके होते. आता पुन्हा एकदा शुल्कात कपात झाल्याने, ग्राहकांना स्वस्त दरात खाद्यतेल उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.