yuva MAharashtra बेंगळुरूमध्ये चेंगराचेंगरीचा थरार; ११ मृत, ४५ जखमी – आरसीबीच्या विजय मिरवणुकीत दुर्घटना

बेंगळुरूमध्ये चेंगराचेंगरीचा थरार; ११ मृत, ४५ जखमी – आरसीबीच्या विजय मिरवणुकीत दुर्घटना


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - गुरुवार दि. ५ जून २०२५


आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने पंजाब किंग्जवर ६ धावांनी विजय मिळवत ऐतिहासिक ट्रॉफी पटकावली. मात्र, या आनंदाला दुसऱ्याच दिवशी दुःखाची किनार लाभली. बुधवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आरसीबीच्या विजयी मिरवणुकीसाठी जमलेल्या प्रचंड चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून ४५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका १४ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.

ही घटना गुरुवारी सकाळी घडली. चाहत्यांनी विजय मिरवणुकीच्या एक झलक पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. काही जण झाडांवर चढले, काहींनी संरक्षक भिंती ओलांडण्याचा प्रयत्न केला. या अफाट गर्दीमुळे नियंत्रण सुटले आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली.

दरम्यान, कर्नाटक सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹१० लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, "या दुर्दैवी घटनेबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. लाखो चाहत्यांची गर्दी झाली होती. पोलिस आणि प्रशासनाने यासाठी ५,००० हून अधिक कर्मचारी तैनात केले होते, पण ही उत्साही तरुणांची गर्दी होती. आम्ही त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करू शकत नाही."


गर्दीच्या काळात पावसाचा फटका देखील बसला. पावसामुळे लोकांनी धावाधाव सुरू केली. मुख्य प्रवेशद्वाराजवळ चेंगराचेंगरी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. 

यापूर्वीच कर्नाटक सरकारने संभाव्य गर्दी पाहता विधान सौधापासून स्टेडियमपर्यंत काढण्यात येणारी ओपन बस मिरवणूक रद्द केली होती. मात्र तरीही चाहत्यांचा ओघ थांबला नाही. त्यामुळे प्रशासनाला कठोर परीक्षा द्यावी लागली.

उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी रुग्णालयात भेट देण्याची घोषणा केली असून परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत.