| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १० जून २०२५
राज्यातील अनेक शासकीय सेवा देणाऱ्या सेतू कार्यालयांतील कामकाज तांत्रिक अडचणींमुळे सध्या ठप्प झाले आहे. महा-आयटी विभागामार्फत सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू असल्याने ऑनलाइन सेवा बंद असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, शासकीय दाखले, प्रमाणपत्रांसाठी आलेल्या नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.
ऑनलाइन सेवा ठप्प, नागरिकांची गैरसोय
जात पडताळणी, उत्पन्न, रहिवास, नागरिकत्व आदी प्रमाणपत्रांसाठी महा-ई-सेवा व सेतू केंद्रांमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, मागील आठवड्यापासून ऑनलाइन सेवा अकार्यक्षम झाल्याने कामकाज ठप्प झाले आहे. आधीच अर्ज केलेल्या नागरिकांचे दाखलेदेखील अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीअभावी प्रलंबित आहेत. लॉगिन होऊ न शकल्याने अधिकाऱ्यांनाही कार्यवाही करता येत नाही, अशी माहिती मिळत आहे.
तांत्रिक अडथळा आणि डेटा सर्व्हरचा बिघाड
राज्यभरातील महा-ई-सेवा केंद्रांचा डेटा एकाच सर्व्हरवर संकलित करण्यात आला आहे. मात्र, याच सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सर्व कार्यालयांचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे. त्यामुळे केवळ दाखल्यांसाठीच नव्हे, तर इतर कामांसाठीसुद्धा लोकांना मोठ्या प्रमाणावर प्रतीक्षा करावी लागत आहे.
शैक्षणिक प्रक्रियांना धक्का
दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज, परीक्षा फॉर्म आणि इतर शैक्षणिक व्यवहार खोळंबले आहेत. अनेक पालक व विद्यार्थी यामुळे त्रस्त झाले असून सरकारच्या व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त करत आहेत. “आमच्या मुलांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे,” अशा संतप्त भावना पालकांनी व्यक्त केल्या आहेत.