| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ मे २०२५
राज्यात महायुती सरकारकडून विविध लाभदायी योजना राबवल्या जात असून, बांधकाम कामगारांसाठीही सरकारकडून संसारोपयोगी वस्तूंचे वाटप केले जात आहे. मात्र, या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे धक्कादायक तपशील समोर येत आहेत.
याआधी नागपूरमध्ये भाजपचे एक आमदार यांनीच या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. आता सांगली जिल्ह्यातही असेच प्रकार उघडकीस आले असून, आणखी एक खळबळजनक बाब म्हणजे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे स्वीय सहायकच या योजनेचा लाभार्थी असल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
संबंधित प्रकरणावर स्वीय सहायकाने खुलासा केला असला, तरी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका मात्र गूढच आहे. त्यांनी अद्याप चौकशीचे आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, चंद्रकांतदादा या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष का करत आहेत?
संजय शिरसाट यांनी स्वतः सांगलीतील लाभार्थी यादीत आपला पीए असल्याचे स्पष्ट केले आणि या योजनेतील भ्रष्टाचारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या योजनेची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी विनंतीही करण्याचे जाहीर केले.
शिरसाट यांनी स्पष्ट केले की, हा प्रकार केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून राज्यभर अशाच स्वरूपाचा भ्रष्टाचार चालू आहे. एजंट आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याचे ते म्हणाले. यावरून ही योजना केवळ लाभार्थ्यांसाठी नसून काही निवडक लोकांसाठीच फायदेशीर ठरत असल्याचा संशय बळावतो.
घटना उघडकीस कशी आली?
संजय शिरसाट यांच्या सांगण्यानुसार, संभाजीनगरमध्ये एका एजंटचा व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तो लाभार्थ्यांची नावे तयार करण्यासाठी काही हजार रुपये घेत असल्याचे स्पष्ट दिसून आले. याच दरम्यान सांगलीतून त्याच्या पीएला एक फोन आला. फोनवर, "तुमची भांडी आली आहेत, येऊन घेऊन जा" असा संदेश दिला गेला. त्यानंतर पीए गोंधळून गेला आणि ही बाब थेट मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे या योजनेतील पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो.
सांगलीत घडलेले हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपर्यंत सीमित नसून, संपूर्ण योजनेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित करत आहे. सामाजिक न्याय मंत्री स्वतः चौकशीसाठी पुढाकार घेत असताना, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील मात्र गप्प का आहेत? ही बाब नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
आज मंत्री संजय शिरसाट सांगली दौऱ्यावर असताना, ते या प्रकरणावर कोणते मत व्यक्त करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.