| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ मे २०२५
प्रथम तीर्थंकर भ. आदिनाथांपासून दहावे तीर्थंकर भगवान शीतलनाथ यांच्यापर्यंत श्रुत ज्ञान सुरु होते, अकरावे तीर्थंकर भगवान श्रेयांसनाथ ते पंधरावे तीर्थंकर भगवान धर्मनाथ यांच्या कालावधीत श्रुत परंपरा खंडीत झाली आणि ती पुन्हा सोळावे तीर्थंकर भगवान शांतीनाथ यांच्या पासून चालू होऊन भ. महावीरांनंतर ती पुढे ५१४ वर्षे चालू राहिल्याचा इतिहास सांगतो.
श्रुतपंचमीच्या प्रारंभाला दोन हजार वर्षाहून अधिक काळाची वैभवशाली परंपरा आहे.
भ. महावीरांचे इंद्रभूती गौतम गणधर ते जंबूस्वामी पर्यंत तीन केवली, तद्नंतर पूर्ण द्वादशांग पारंगत पाच श्रुतकेवली आचार्य नंतर अकरा अंगाचे अकरा आचार्य व दहा पूर्वांगाचे ज्ञाते, नंतर पाच आचार्य अकरा अंगाचे ज्ञाते व नंतर चार आचार्य आचारंगाचे धारक होते. येथे पूर्वांगाची परंपरा संपली.
धवल ग्रंथावर विस्तृतपणे लिहिणारे टिकाकार आचार्य वीरसेन स्वामी यांच्या मते, श्री इंद्रभूती (गौतम) गणधर यांना भगवान महावीरांच्या मुखातून श्रुतज्ञान प्राप्त झाले. त्यांच्याकडून सुधर्माचार्यांनी ते प्राप्त केले आणि पुढे त्यांच्याकडून जंबू नावाच्या शेवटच्या केवलीला ते प्राप्त झाले.
१०० वर्षांनंतर १-विष्णू, २- नंदीमित्र, ३- अपराजित, ४- गोवर्धन आणि ५- भद्रबाहू, हे पाच आचार्य पूर्ण द्वादशांग जाणून श्रुतकेवाली झाले.
त्यानंतर अकरा आचार्य अकरा अंगांचे आणि दहा पूर्वांगाचे तज्ज्ञ झाले- १- विशाखाचार्य, २- प्रोष्ठिन ३- क्षत्रिय, ४- जय, ५- नाग, ६- सिद्धार्थ, ७- धृतिसेन, ८- विजय, ९- बुद्धिल, १०-गंगदेव , ११- धर्मसेन यांचा कालावधी १८३ वर्षे त्यानंतर १-नक्षत्र, २-जयपाल, ३-पांडू, ४-ध्रुवसेन आणि ५-कंस हे पाच आचार्य अकरा अंगांचे धारक आहेत. त्यांचा कालावधी २२० वर्षे आहे.
त्यानंतर १-सुभद्रा, २-यशोभद्र, ३-यशोबाहू आणि ४-लोहार्य हे चार आचार्य फक्त आचारंगाचे धारक बनले. त्यांचा कालावधी ११ वर्षे आहे.५१४ वर्षानंतर अंग आणि पूर्वांगांची परंपरा संपली आणि सर्व अंगांचे आणि पूर्वांगाच्या एका भागाचे ज्ञान आचार्य परंपरेद्वारे धर्मसेनाचार्य यांना मिळाले.
आचार्य धरसेन गुजरातमधील काठियावाडातील गिरनार येथील चंद्रगुफा येथे राहत होते. जेव्हा ते खूप वृद्ध झाले, तेव्हा त्यांनी श्रुतज्ञानाची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी 'पुष्पदंत' आणि 'भूतबली' या दोन मुनिराजांना श्रुतज्ञान दिले; या ज्ञानाद्वारे, मुनिराजांनी सहा खंडांची रचना केली (जीवस्थान, क्षुद्रक बंध, बंध स्वामित्व, वेदना खंड, वर्गाखंड आणि महाबंध); भूतबली आचार्य यांनी षटखंडागम सूत्रांचे संपूर्ण संकलन ग्रंथरूपात केले. पुष्पदंत आणि भूतबली आचार्य यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे जैन दर्शनातील पहिला "षटखंडागम" हा ग्रंथ होय.
षटखंडागम म्हणजे सहा खंडांचा (भागांचा) असलेला आगम ग्रंथ होय. ज्येष्ठ शुक्ल पंचमीच्या दिवशी चतुर्विध संघासह सर्व विधींसह षटखंडागम ग्रंथाची महापूजा करण्यात आली. त्या दिवसापासून ही पंचमी श्रुतपंचमी म्हणून प्रसिद्ध झाली. कारण भगवान महावीरांचे तत्वज्ञान प्रथमच लिखित ग्रंथरूपात सादर करण्यात आले. याआधी भगवान महावीरांचे शब्द लिहिण्याची परंपरा नव्हती. ते ऐकल्यानंतरच लक्षात ठेवले जात असे, म्हणूनच त्याला 'श्रुत' असे म्हटले जात असे. या दिवसापासून श्रुत परंपरा लिखित परंपरा म्हणून सुरू झाली.
षटखंडागमावर बाराशे वर्षापूर्वी वीरसेन आचार्यांनी पहिल्या पाच खंडावर ७२००० श्लोकाचा १६ भागात धवल नावाचा विस्तृत ग्रंथ रचला आहे.
महाधवल ग्रंथात तीस हजार श्लोक आहेत. कसायपाहुड मध्ये साठ हजार श्लोक आहेत. षटखंडागम व कसायपाहुड दोन्ही मिळून एक लाख बासष्ट हजार श्लोकाचे धवल ग्रंथ आहेत.
षटखंडागम ग्रंथाचे मंगलाचरण णमोकार मंत्र आहे. सर्वप्रथम णमोकार मंत्र याच ग्रंथात लिहिला गेला आहे. याच कालखंडात गणधराचार्य झाले. त्यांनी कसायपाहुड हा ग्रंथ लिहिला.
श्रुत पंचमीच्या दिवशी, मंदिरातील धर्मग्रंथांच्या भांडारांमधून प्राकृत, संस्कृत आणि प्राचीन भाषांमधील मूळ धर्मग्रंथ बाहेर काढतात, धर्मग्रंथ स्वच्छ करतात, जुन्या धर्मग्रंथांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना नवीन कपड्यांमध्ये गुंडाळतात आणि देवाच्या वेदीजवळ ठेवतात आणि त्यांची पूजा करतात, कारण या दिवशी जैन धर्मग्रंथ लिहिले जात होते आणि त्यांची पूजा केली जात होती.
प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांनी अंतीम उपदेशात आगम स्वाध्यायाचे महत्त्व सांगितले आहे. "अकरा अंग व चौदा पुर्व शास्त्र महासमुद्र आहे. त्याचे वर्णन करणारे आज कोणी केवली नाहीत, श्रुत केवली नाहीत. आमच्यासारखे क्षुद्र काय वर्णन करणार ? आत्म्याचं कल्याण करणारी जिनवाणी सरस्वती क्षुतदेवी आहे. ही जिनवाणी जो कोणी जीव धारण करील त्या जीवाचं कल्याण होईल . त्यापैकी एक ॐ हे एकच अक्षर जो धारण करतो त्या जीवाचं कल्याण होतं.
दररोज स्वाध्याय करा. शास्त्रज्ञानच आपल्याला तारक आहे. त्यामुळे मोक्षामार्ग प्रशस्त होतो. आचार्यश्री उपदेशात म्हणतात, "देवपूजा , गुरुपासना,स्वाध्याय ,संयम,तप व दान या सहा गृहस्थाच्या क्रिया आहेत. असि, मसि, कृषी, शिल्प, वाणिज्य आणि विद्या या सहा धंद्या पासून होणाऱ्या पापाचा त्या सहा क्रियानी क्षय होतो . त्या मुळे इंद्रियसुख मिळत .पूण्य प्राप्त होत . पंच पापाचा त्याग केल्यापासून पंचेंद्रिय सुख मिळतं . पण मोक्ष मिळतं नाही.
संपत्ती, संतति, वैभव, राज्यपद, इंद्रपद पुण्यानं मिळत. परंतु मोक्ष फक्त आत्म चितनांनेच मिळतो. नय (युक्त) शास्त्र व अनुभव या तिन्हीचा मेळ घालून पहावा. मोक्ष कशाने मिळतो ? मोक्ष आत्म चिंतनानेच मिळतो. ही भगवंताची वाणी आहे. ही एकच सत्य वाणी आहे . या वाणीचा एक शब्द ऐकला तरी जीव चढून मोक्षाला जातो. मोक्ष मिळण्यास फक्त आत्मचिंतनच कारण आहे. हे कार्य करायलाच पाहिजे सारांश, धर्मस्थ मूल दया. जिनधर्माच मूळ ‘सत्य अहिंसा ‘ आहे ”सत्य अहिंसा’ आपण सगळे मुखाने म्हणतो ‘स्वयपाक- जेवण’ ‘स्वयपाक-जेवण ‘ अस फक्त तोड़ानं म्हंटल्यानं पोट भरत का? प्रत्यक्ष क्रिया केल्या शिवाय , जेवल्या शिवाय पोट भरत नाही . वचन क्रिये मध्ये आणलं पाहिजे.
बाकी सर्व सोडा ‘ सत्य अहिंसा ‘ पाळा. सत्यामध्ये सम्यक्त्व येतं व अहिंसे मध्ये सर्व जिवाच रक्षण होतं. म्हणून हा व्यवहार करा, हा व्यवहार पाळा , त्या मुळे कल्याण होईल .याचा अर्थ आगमाचा/तीर्थंकर वाणीचा अभ्यास करुन ज्ञानी व्हा..
जैन समाजाने आगम ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे. आत्मचिंतन केलं पाहिजे. नव्या पिढीला याचे महत्व सांगितले पाहिजे, खरे देव, खरे गुरु आणि खरे शास्त्र यांचे भक्त व्हा.. हा संदेश वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी दिला होता. यासाठी पाठशाळेतून आपली मुलं सुसंस्कारीत करा हा संदेश श्रुतपंचमीचा आहे.
प्रा. एन.डी.बिरनाळे
सांगली.