| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३१ मे २०२५
महाराष्ट्र सरकारच्या 'लाडकी बहीण' या महत्त्वाकांक्षी योजनेतून गरजू महिलांना आर्थिक आधार देण्याचा उद्देश होता. यासाठी लाखोंनी अर्ज केले. मात्र आता या योजनेतून लाभ घेणाऱ्यांमध्ये नियमबाह्य पात्रतांमुळे मोठा गैरप्रकार समोर आला आहे.
सरकारी नोकरीत कार्यरत असलेल्या महिलांनी लाभ घेऊ नये, असा स्पष्ट नियम असूनही, १.२० लाख महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केल्याचे उघडकीस आले आहे. या अर्जांपैकी अनेकांना लाभही वितरित झाला असून, प्राथमिक तपासणीत २,६५२ महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत थेट अनुदान जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या महिला कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट २०२४ ते एप्रिल २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत प्रत्येकी ₹१३,५०० इतकी रक्कम मिळवली. एकूण मिळकतीचा आकडा जवळपास ₹३.५८ कोटींवर पोहोचतो. आता योजनेचा गैरफायदा घेतलेल्या या महिलांकडून संपूर्ण रक्कम परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने 'सेवार्थ प्रणाली' आणि युआयडी डेटाचा वापर करून ही पडताळणी केली. उर्वरित सहा लाख कर्मचाऱ्यांचीही अशाच पद्धतीने चौकशी करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.
लवकरच संबंधित विभागांना रकमेच्या वसुलीसंदर्भात अधिकृत आदेश जारी करण्यात येणार असल्याची माहितीही पुढे आली आहे.