| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ मे २०२५
सांगली जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात चालणाऱ्या उद्योगांनी परवानगीशिवाय सॉल्वेंट आणि धोकादायक रसायनांचा वापर केल्याचे आढळल्यास, संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात "रासायनिक अपघात – आपत्ती नियोजन, तयारी व प्रतिसाद" (1996 नियमावली) अंतर्गत आयोजित जिल्हा अरिष्ट समूहाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे कोल्हापूरचे सहसंचालक व समुह सचिव डॉ. अ. मो. अवसरे, सांगलीचे सहायक संचालक प्र. अ. बोंदर, कोल्हापूरचे सु. बि. सुत्तार, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, इस्लामपूरचे श्रीनिवास अर्जुन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी काकडे यांनी सांगितले की, सर्व औद्योगिक युनिट्सनी आपले आपत्ती व्यवस्थापन आराखडे वेळोवेळी अद्ययावत करावेत. नियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडील जबाबदाऱ्या नीट पार पाडता याव्यात यासाठी त्यांना नियमित प्रशिक्षण दिले जावे. कोणताही अपघात घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणाव्यात.
ते पुढे म्हणाले की, आकस्मिक स्वरूपात मॉक ड्रिल घेऊन तयारीची चाचणी घ्यावी. आपत्ती काळात वापरायची साधने व संसाधने नीट तपासून त्यातील त्रुटी तत्काळ दूर कराव्यात. पूर्वसूचना प्रणाली व घटना आदेश यंत्रणा सक्षम ठेवाव्यात. रासायनिक गळतीमुळे स्थानिक नागरिकांवर परिणाम होऊ नये, यासाठी योग्य ती उपाययोजना आखावी.
या बैठकीत प्र. अ. बोंदर यांनी रासायनिक आपत्ती व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेल्या योजनांचे सविस्तर सादरीकरण केले.