| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ३ मे २०२५
ऐतिहासिक नगरी असतानासुध्दा मिरज शहराचा अपेक्षित विकास झाला नाही, हे मान्य करावे लागेल. मात्र, मिरज सुधार समिती सारख्या सामाजिक संघटना अग्रेसर होऊन काम करीत असल्याने विकासाबाबत आश्वासक वातावरण निर्माण होत आहे. मिरज सुधार समितीचे संकेतस्थळ हे जनता आणि प्रशासनामधील दुवा ठरेल, असा विश्वास गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र दिनानिमित्त मिरज सुधार समितीने मिरज शहरासह तालुक्यातील नागरी प्रश्न जाणून घेण्यासाठी तसेच, नागरिकांना विविध शासकीय माहिती उपलब्ध करून देण्यासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, अनेक संघटना स्थापन होतात त्या कागदावरच राहतात. काही महिने चालतात. मात्र मिरज सुधार समितीचे काम मागील दोन दशकांपासून निरंतरपणे सुरू आहे. वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या धर्मातील, समाजातील, वेगवेगळ्या क्षेत्रातील, व्यवसायातील लोक एकत्र येऊन मिरज सुधार समितीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न मांडत आहेत. त्यांना मदत करत आहेत. या कामासाठीच संकेतस्थळ सुरु करुन नागरिकांना एक हक्काचे व्यासपीठ मिरज सुधार समितीने उपलब्ध करून दिले आहे.