yuva MAharashtra पूरनियंत्रणासाठीच्या निधीचा वापर गटार बांधकामासाठी कितपत योग्य ? – खा. विशाल पाटील

पूरनियंत्रणासाठीच्या निधीचा वापर गटार बांधकामासाठी कितपत योग्य ? – खा. विशाल पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ मे २०२५

सांगली शहरासह जिल्ह्यात दरवर्षी निर्माण होणाऱ्या संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून ६०० कोटींचा निधी सांगली महापालिकेला प्राप्त झाला आहे. या निधीतून १०० फुटी रस्त्यावर मोठे गटार बांधून पाणी निचऱ्याची व्यवस्था करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, पूर नियंत्रणासाठी मिळालेल्या निधीचा वापर नव्या गटारासाठी करणे योग्य ठरेल का, असा प्रश्न खासदार विशाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

आज सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत माजी नगरसेवक, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत १०० फुटीवरील अतिक्रमणांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन उपक्रमाचे कौतुक केले आणि शहरात रस्ते स्वच्छ ठेवण्याची गरज अधोरेखित केली.

ते पुढे म्हणाले की, १०० फुटी रस्त्यावर विद्यमान भोपे गटार आहेच, आणि आता दुसऱ्या बाजूसही नवीन गटार उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, इतक्या मोठ्या निधीतून केवळ गटार बांधून पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल का, याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी.


विशाल पाटील यांनी असेही सुचवले की, निधीचा काही भाग वाचवून शेरीनाल्यावरील बंधाऱ्याची उंची वाढवावी, जेणेकरून नदीचे पाणी शेरीनाल्यात आणि शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळण्याचा धोका टळेल. त्यांना गटार बांधकामाचा विरोध नाही, मात्र निधीचा वापर पूरनियंत्रणाच्या मूळ उद्देशासाठीच व्हावा, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, १०० फुटीवरील सर्व अतिक्रमण स्वतःहून हटवण्याची तयारी स्थानिकांनी दर्शवली आहे. त्यासाठी थोडा अवधी द्यावा, तसेच भविष्यातील नवीन इमारतींसाठी किमान १५ फुट जागा खुली ठेवण्याचा नियम लागू करण्याबाबतही चर्चा झाली असल्याचे पाटील यांनी सांगितले.