| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ मे २०२५
सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले खासदार विशाल पाटील यांच्याबाबत पुढील राजकीय निर्णय त्यांनीच घ्यावा, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी घेतली आहे. जिल्ह्यातील जनतेने मताधिकाराने त्यांना निवडून दिले असून, आता कुठल्या पक्षात प्रवेश करायचा किंवा स्वबळावरच पुढे जायचं, हा निर्णय पूर्णतः त्यांचा आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
शुक्रवारी जयंत पाटील सांगली महापालिकेत आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. भाजप नेते आणि राज्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना पक्षात येण्याची वारंवार ऑफर दिल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, “ही ऑफर प्रत्यक्ष दिली आहे की केवळ चर्चेपुरती आहे, हे स्पष्ट नाही. काही ऑफर्स गुपचुप दिल्या जातात, तर काही केवळ बोलण्यापुरत्याच राहतात. त्यामुळे या बाबतीत अधिक काही बोलणे उचित नाही."
अलमट्टीप्रश्नी नदीकाठच्या भागांना डावलले
मुंबईत झालेल्या 'अलमट्टी धरण' संदर्भातील बैठकीत सत्ताधाऱ्यांनी निवडक आमदारांनाच आमंत्रण दिले, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. त्यांनी सांगितले की, सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील पूरप्रवण भागातील आमदारांना बैठकीसाठी दुर्लक्षित करण्यात आले. “पूर्वीचे सरकार सर्वांशी संवाद साधत असे. मात्र, सध्याच्या सरकारची भूमिका वेगळी आहे,” असे ते म्हणाले.
सरकारने 'अलमट्टीचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होत नाही' अशी भूमिका घेतली आहे, पण प्रत्यक्षात पावसाळ्यात याचे परिणाम दिसतीलच, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले. “आपेक्षा फक्त इतकीच – पूर टळावा,” असे ते म्हणाले.
अवकाळी पावसामुळे नुकसान
तातडीने पंचनाम्याची मागणी
शेतकऱ्यांच्या अलीकडील नुकसानावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अवकाळी पावसामुळे अनेक भागांतील शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी. "फक्त शेतीच नाही, तर ढेकळलेली जमीन आणि मोकळ्या पडिक जागांचाही पंचनामा करण्यात यावा," अशी मागणी त्यांनी केली.