| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ मे २०२५
भाजपची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया आता अंतिम वळणावर पोहोचली आहे. मंडळ अध्यक्ष निवडीनंतर आता राज्यातील 78 जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यासाठीचे मतदान पूर्ण झाले असून, लवकरच एकाच दिवशी सर्व जिल्हाध्यक्षांची नावे अधिकृतपणे जाहीर होणार आहेत.
या निवडींसाठी भाजपने प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती केली होती. यांच्यासह मतदानासाठी एक विशेष समितीही स्थापन करण्यात आली होती. या समितीत विद्यमान जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, माजी आमदार, प्रदेश पातळीवरील पदाधिकारी आणि माजी नगराध्यक्ष यांचा समावेश होता.
या समितीतील सदस्यांनी आपली मते 1, 2, 3 अशा क्रमवारीने बंद लिफाफ्यात नमूद करत निरीक्षकांकडे सुपूर्द केली. निरीक्षकांनी यानंतर जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्यांचे अभिप्राय गोळा केले आणि मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
सध्या बहुतांश जिल्ह्यांतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, निरीक्षकांनी आपले अहवाल पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सादर केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, जिल्हाध्यक्ष पदावर कोण बसणार यासाठी प्रत्येक गटाकडून हालचाली सुरू आहेत.
घोषणेचं व्यासपीठ - ऐतिहासिक चौंडी ?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच दरम्यान, 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतरच भाजप प्रदेशाध्यक्षांकडून 78 जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांची अधिकृत घोषणा चौंडीमधून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
असे असतील निवडीचे निकष :
1. इच्छुक उमेदवार शिस्तप्रिय आणि प्रामाणिक असावा.
2. पक्षात अनुभव असलेला कार्यकर्ता असावा.
3. संघटनेत पूर्वी जबाबदारी सांभाळलेला असावा.
4. किमान दोन कार्यकाळ सक्रिय सदस्यत्व असणे आवश्यक.
5. अलीकडे पक्षात प्रवेश केलेल्यांचा विचार केला जाणार नाही.
6. इच्छुक उमेदवार आमदार किंवा खासदार नसावा.
7. महिलांसह SC/ST घटकांचे प्रतिनिधित्व आवश्यक.
8. वयोगट 45 ते 60 वर्षांदरम्यान असावा.