| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २८ मे २०२५
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. महायुतीकडून एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत असताना, भाजप आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला.
मुंबई दौऱ्यावर आलेल्या शहा यांच्यासमोर आमदारांनी अजित पवार मुद्दामच पराभूत उमेदवारांना बळ देतात, असा आरोप केला. 2024 च्या निवडणुकीत काही ठिकाणी भाजप उमेदवारांना पाडण्यासाठी हे पाऊल उचलले गेले, असा भाजप आमदारांचा दावा होता.
त्यावर उत्तर देताना अमित शहा यांनी आमदारांना स्पष्टपणे सांगितले की, “तुमची संख्याबळ अधिक आहे, त्यामुळे मागे हटण्याचं कारण नाही. प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा. एवढं काम करा की, शेवटी अजितदादाच माझ्याकडे तक्रार घेऊन यायला भाग पडले पाहिजे.”
मुंबई, ठाणे, पुण्यात भाजप स्वबळावर ?
या भेटीत शहा यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांबाबतही महत्त्वाचे संकेत दिले. मुंबई, ठाणे आणि पुणे – या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजप स्वबळावर लढण्याच्या शक्यतेची चाचपणी करण्याचे सूतोवाच त्यांनी महायुतीतील नेत्यांना केले आहे, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.