| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ मे २०२५
सावली ही माणसाच्या आयुष्यात नेहमीची सोबती असते. मात्र बुधवारी, ७ मे रोजी सांगली जिल्ह्यातील नागरिकांना एक अद्वितीय अनुभव येणार आहे — स्वतःची सावली काही क्षणांसाठीच गायब होणार आहे. दुपारी १२ वाजून २८ मिनिटांनी ‘शून्य सावली दिवस’ अनुभवता येईल, अशी माहिती खगोल अभ्यासक डॉ. संतोष माने यांनी दिली.
डॉ. माने यांच्या मते, ७ मे ते ९ मे या दरम्यान सांगली जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये हे नैसर्गिक चमत्कारप्राय दृश्य पाहायला मिळणार आहे. सूर्य, पृथ्वी आणि अक्षांश यातील विशिष्ट कोनांमुळे हा क्षण तयार होतो. या काळात प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली थेट तिच्याखाली राहते आणि काही क्षणांसाठी पूर्णपणे अदृश्य होते. यालाच वैज्ञानिक भाषेत "शून्य सावली दिवस" असे म्हटले जाते.
पृथ्वीचा परिभ्रमण अक्ष सूर्याभोवती फिरताना थोडा कललेला (२३.५ अंश) असल्यामुळे सूर्याचा उत्तरायण व दक्षिणायन मार्ग निर्माण होतो. जेव्हा सूर्य कर्कवृत्त व मकरवृत्त यामधील भागावर थेट डोक्यावर येतो, तेव्हा सावली शून्यावर जाते. सांगली जिल्ह्यात यावर्षी ७ मे रोजी सांगली, मिरज, वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळ आणि शिराळा येथे हा अनुभव मिळणार आहे. तर ८ मे रोजी जत, पलूस, खानापूर आणि कडेगावमध्ये, तसेच ९ मे रोजी आटपाडी परिसरात ‘शून्य सावली’ अनुभवता येणार आहे.
या अनोख्या घटनेचा अनुभव घेण्यासाठी कोणत्याही विशेष साधनांची गरज नाही. फक्त ठरलेल्या वेळेला (१२:28 वाजता) घराबाहेर येऊन आपल्या सावलीकडे पाहा — ती क्षणभर ‘गायब’ झालेली दिसेल!
महाराष्ट्रातील अनेक भागांत ३ मे ते ३१ मे दरम्यान विविध तारखांना ‘शून्य सावली दिवस’ पाहता येणार आहे. विज्ञानाच्या या अद्भुत घटनांनी निसर्गातील गूढतेची एक झलक अनुभवता येईल.